चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )
शहरातील अनेक परीसरात अवैध दारू, जुगार, मटका या अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे.
हे अवैध धंदे खुलेआम सुरू असूनही पोलीस प्रशासनाचे हाताची घडी अन् तोंडावर बोट आहे. अवैध धंदे स्थानिक ठाणेदारांच्या आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात सुरु असुन पोलीस कर्मचारी हप्ते घेत असल्याचीही खमंग चर्चा शहरात आहे. एवढे असतांनाही नवीन आलेले ग्रामिण पोलीस अधिक्षक अभिनाश कुमार यांचा प्रभाव शहरात फिका पडला असल्याचे दिसत आहे.
शहरात काही महिन्यांपासून अवैध धंद्यांचा मोठा सुळसुळाट सुरु आहे. शहरातील ठेल्यांवर, हॉटेलमध्ये बेकायदा अवैध दारू राजरोसपणे सुरु आहेत. दारुबंदीच्या निर्णयानंतरही शहरात काही ठिकाणी राजरोसपणे दारु विक्री तसेच खुलेआम मटका आणि जुगार स्थानिक ठाणेदारांच्या आशिर्वादाने सुरुच असल्याचे चित्र आहे. पोलिस ठाण्यातीलच काही कर्मचाऱ्यांचे या अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याची धडक चर्चा आहे. अवैध धंदे रोखण्याची स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही मानसिकता दिसून येत नाही. ते कानाडोळा करीत असल्याने येथील मटका, जुगार, दारू खुलेआम विक्री सुरु झाल्याने येथे गुन्हेगारांची संख्या देखील वाढली आहे. हे अवैद्य धंदे शहरातील रस्त्यालगत खुलेआम दुकाने थाटून सुरु आहेत. ही दुकाने स्थानिक व वरिष्ठ पोलीस अधिकारी ये-जा करतांना पाहत असतात. मात्र कारवाई का करत नाही? हा प्रश्न शहवासीयांना कायमच सतावत आहे. या रस्त्यालगत अनेक दारुडे पडलेले आढळतात. मात्र काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे स्थानिक शहरवासीयांकडुन पोलीस प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच काही दिवसांपुर्वी ग्रामिण पोलीस अधिक्षकाचा पदभार नागपुरवरून आलेले अभिनाश कुमार यांनी सांभाळला. त्यांचा नागपुरचा कारभार पाहता शहरातीला सुरूवातीला अवैध धंदेवाल्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता त्यांचा प्रभाव चांदुर रेल्वे शहरात फिका पडल्याचे दिसते. रूजु झाल्यापासुन शहराकडे पोलीस अधिक्षकांचे दुर्लक्ष झाले आहे. आता ग्रामिण पोलीस अधिक्षकांनी शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांचे अवैध धंदेवाल्यांशी असलेले लागेबांधे मोडीत काढून अवैध धंदेवाल्यांवर वचक निर्माण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. मात्र वरीष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन शहर अवैध धंद्यापासुन मुक्त करून पोलीसांवर कारवाई करणार का हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.