चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )
चांदुर रेल्वे शहरात रेल्वेथांब्याचा प्रश्न दिवसेंदिवस चिघडत असतांना वर्धा लोकसभा मतदान संघाचे खासदार रामदास तडस यांनी चांदुर रेल्वे शहराला येत्या २ महिन्यांत रेल्वे थांबा मिळाला नाही तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल असे वक्तव्य त्यांनी केले. ते शहरात एका कार्यक्रमासाठी सोमवारी आले असता स्थानिक विश्रामगृहात चर्चेदरम्यान त्यांनी मत मांडले.
चांदुर रेल्वे शहरात रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा ही मागणी अनेक वर्षापासुनची आहे. रेल्वे थांबा मिळण्यासाठी रेल रोको कृती समितीमार्फत वेळोवेळी खासदार, रेल्वे प्रशासनाला अनेक निवेदने व विनंती अर्ज करण्यात आले. तसेच आंदोलने सुध्दा करण्यात आली. मात्र तरीही थांबा मिळालेला नाही. रेल्वे थांब्याचे वचन चांदुर रेल्वे वासीयांना खासदार रामदास तडस यांनी दिल्यानंतर ते अजुनही पुर्ण न केल्यामुळे त्यांच्याप्रती शहरवासीयांत रोष आहे. त्यामुळे खासदार तडससुध्दा अनेक महिन्यांपासुन चांदुर रेल्वे शहरात आले नव्हते. मात्र सोमवारी एका कार्यक्रमासाठी ते चांदुर रेल्वे शहरात आले असता त्यांनी काही नगरसेवक, कार्यकर्ते, शहरवासीयांसोबत स्थानिक विश्रामगृहात चर्चा केली. यावेळी खासदार तडस यांनी येत्या दोन महिन्यात रेल्वे थांबा मिळवुन देण्याचे आश्वासन दिले. व दोन महिन्यात चांदुर रेल्वे शहराला रेल्वे थांबा मिळाला नाही तर ते भारतीय रेल्वे, नागपुर विभागीय रेल्वे समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देईल असे वक्तव्य केले. त्यामुळे खासदारांच्या बोलण्यावरून चांदुर रेल्वे येथे रेल्वे थांबा मिळण्याची चिन्हे दिसत आहे…..
खासदारांच्या वक्तव्याचा स्वागत करतो – भाजप नगरसेवक श्री मोटवानी
खासदार रामदास तडस यांनी सोमवारी रेल्वे थांब्याविषयी शहरात केलेल्या वक्तव्याचा मी स्वागत करतो. शहरात रेल्वे थांब्याची मुख्य मागणी असुन शहरवासीयांत याविषयी संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे खरोखरच शहराला रेल्वे थांबा मिळाला तर आम्ही खासदारांचा नागरी सत्कार करू असे मत नगरसेवक संजय मोटवानी यांनी केले.