मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीश्वरांचे पाय चाटतात. ते कोकण उद्धवस्त करायला निघालेत, मात्र कोकणची जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर होऊ घातलेला नाणार प्रकल्प गेले काही दिवस गाजतो आहे. शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. यासंबंधाने भूमिका स्पष्ट करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाणारमध्ये आले आहेत. यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, 3 लाख कोटी, 4 लाख कोटींचे प्रकल्प कोकणला नकोत. प्रदूषणामुळे कोकण उद्धवस्त होणार आहे. शिवसेनेने नाणार प्रकल्पाला सातत्याने विरोध केला आहे. मी स्वत: पंतप्रधान, पेट्रोलिय मंत्र्यांना भेटलो आहे. मुख्यमंत्र्यांना ग्रामसभांचे ठराव दिले, मात्र मुख्यमंत्री फक्त हसले. ते दिल्लीश्वरांचे पाय चाटतात, कोकणाला उद्धवस्त करायला निघालेत, मात्र ते शिवसेना होऊ देणार नाही.