भाग्यनगर (तेलंगण) – गोरक्षणासाठी येथील गोशामहल मतदारसंघातील भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी पक्षाचा त्याग करत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सामाजिक माध्यमांवर एक चित्रफीत ‘पोस्ट’ करून ही घोषणा केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, ‘‘मी एक हिंदु असून गोमातेची रक्षा करणे हे माझे कर्तव्य आहे. राजकारण नंतरही करता येईल; पण गायींचे रक्षण करणे आवश्यक आहे. आता रस्त्यावर उतरून राज्यभरातील पशूवधगृहे बंद करण्यासाठी आंदोलन करणार.’’ गायींच्या रक्षणासाठी राज्यातील पशूवधगृहे बंद करावीत, अशी मागणी टी. राजासिंह यांनी विधानसभेत अनेकदा केली होती. या मागणीला तेलंगणमधील अन्य पक्षांनी तर सोडाच, भाजपनेही कधी समर्थन केले नाही.