नवी देहली – पद्मावतीची कथा सलीम-अनारकली यांच्या कथेसारखीच काल्पनिक आहे. या कथेचा इतिहासात कुठेच उल्लेख नाही, असे विधान गीतकार जावेद अख्तर यांनी केले आहे. ज्यांना इतिहासाची आवड आहे, त्यांनी चित्रपट पाहण्याऐवजी पुस्तके वाचली पाहिजेत आणि त्यातील इतिहास समजून घेतला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. चित्रपटांना इतिहास समजू नका आणि इतिहासाची माहिती चित्रपटांमधून समजून घेऊ नका. चित्रपट पहा आणि त्याचा आनंद घ्या असे आवाहनही त्यांनी केले. साहित्य आज तक या कार्यक्रमात ते बोलत होते.
जावेद अख्तर म्हणाले की,
१. मी इतिहासकार नाही; मात्र जे प्रसिद्ध इतिहासकार आहेत किंवा जाणकार आहेत त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचल्याने मी हे सांगू शकतो.
२. दूरचित्रवाहिनीवर इतिहासाच्या एका प्राध्यापकाने दिलेली माहिती मी येथे सांगू इच्छितो. पद्मावतीची रचना आणि अल्लाउद्दीन खिलजी याचा कालावधी यांत फार अंतर आहे. जायसी यांनी ज्या वेळी ही कथा लिहिली तो काळ आणि खिलजी याची कारकीर्द यांच्यात जवळपास २०० ते २५० वर्षांचा फरक होता. त्या वेळी इतिहासावर बरेच लेखन झाले. तेव्हाची सर्व माहिती उपलब्ध आहे; मात्र त्यात पद्मावतीचा उल्लेखच नाही.
३. जोधाबाई मुघल-ए-आझम चित्रपटामध्येही होती; मात्र जोधाबाई अकबरची पत्नी नव्हती. अकबरच्या पत्नीचे नाव जोधाबाई नव्हते. कथा बनवल्या जातात, त्यात काय एवढे ?