सातारा आणि कराड येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने प्रशासनाला निवेदन
सातारा – मुंबई येथील आतंकवादविरोधी पथकाने ९ ऑगस्टच्या रात्री नालासोपारा येथील गोरक्षक श्री. वैभव राऊत, श्री. शरद कळस्कर आणि सातारा येथील श्री. सुधन्वा गोंधळेकर यांना स्फोटके बाळगल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. या वेळी आतंकवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी कायदाबाह्य वर्तन केले. यामुळे अन्याय्य कारवाई करणार्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी सातारा आणि कराड येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सातारा येथे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सचिन बारावकर यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी विश्व हिंदु परिषदेचे श्री. जितेंद्र वाडेकर, बजरंग दलाचे श्री. रविकुमार कोठाळे, हिंदु एकता आंदोलनचे श्री. दीपक लोकरे, भाजपचे श्री. जयदीप ठुसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणेे आदींसह ६० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. वारकरी संप्रदाय, योग वेदांत सेवा समिती आदी आध्यात्मिक संप्रदायांनीही पाठिंबा दर्शवला. कराड येथे तहसीलदार श्री. राजेंद्र शेळके यांना निवेदन देतांना श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे सर्वश्री सागर आमले, निखिल शहा, एकनाथ गावडे, उल्हास बेंद्रे, भाजपचे श्री. विष्णु पाटसकर, रा.स्व.संघाचे श्री. सत्येंद्र जाधव, हिंदु एकता आंदोलनचे श्री. राहुल यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत, सनातन संस्थेचे श्री. लक्ष्मण पवार आदींसह ३५ हून अधिक कार्यकर्ते सहभागी होते.
निवेदनामध्ये म्हटले आहे की,
१. श्री. राऊत, श्री. कळस्कर, श्री. गोंधळेकर यांना ८ ऑगस्टच्या पहाटे कह्यात घेतले; पण १० ऑगस्टला अटक केल्याचे दाखवले.
२. अटकेनंतर पोलिसांनी कुटुंबीय किंवा अधिवक्ता यांना कळवण्याच्या नियमांचे पालन केले नाही.
३. पोलिसांनी श्री. वैभव राऊत यांच्या घरून जप्त केलेल्या सामानाचा पंचनामाही केला नाही.
४. तपासाच्या नावाखाली तिघांनाही अमानवी मारहाण करण्यात आली. हे गंभीर असून मानवाधिकारांचा भंग करणारे आहे.
५. यावरून दिसून येते की, नियमांना बगल दिली. हे अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे. संपूर्ण प्रकरणात पोलिसांचे वागणे संशयास्पद आणि हिंदुत्वनिष्ठांवर दबावतंत्र निर्माण करणारे आहे.
६. या प्रकरणातील संबंधित पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.