अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भातील मतदान व मतमोजणीची प्रक्रिया संपल्याने निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. दरम्यान, निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची मुदत 29 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.
निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख 21 जानेवारी अशी होती. तथापि, निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची व त्यात निवडून आलेल्या सदस्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे निवडणूक निकालाच्या अधिसूचनेत एकही त्रुटी राहू नये व निर्वाचित सदस्याचे पूर्ण नाव, प्रभाग क्रमांक, जागा, प्रवर्ग आदी तपशीलासह अचूकपणे अधिसूचना प्रसिद्ध व्हावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक आता 29 जानेवारी असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार यांनी सांगितले.