अमरावती, दि. 30 : कोरोना साथ लक्षात घेता तिथीनुसार दि. 31 मार्चला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पद्धतीने व दक्षता पाळून साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
शासनाने याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्याबाबत अपर जिल्हा दंडाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी विविध यंत्रणांना पत्रही निर्गमित केले आहे. कोरोना साथ लक्षात घेता यादिवशी प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणूका काढण्यात येऊ नये. पोवाडे, व्याख्यान, गाणी, नाटके आदींचे सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून प्रक्षेपित करावेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला अभिवादन कार्यक्रम 100 व्यक्तींच्या मर्यादित उपस्थितीत घेऊन सोशल डिस्टन्सिंग पाळावे. यादिवशी रक्तदान शिबिर, आरोग्यविषयक उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
000