CCTV कॅमेरे धुळखात; मेंटेनन्सची मलाई घश्यात?
शेगांव :- संतनगरी शेगांवमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरीता हजारो लाखो भाविक रोज येतात, ज्या शहरात हजारो भक्तगण येत असतील आणि तीच त्या शहराची आर्थिक कडी असेल तर, भक्तांची गैरसोय न व्हावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता तसेच,
शहराच्या सुरक्षेकरिता मग ती चोरी असो वा उपद्रवीवर नियंत्रण ठेवण्यासाठी असो पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून चौका चौकात, सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. कॅमेऱ्याचे काम शेगांव नगर परिषदेत असलेल्या सत्ताधारी यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून ही, या CCTV कॅमेऱ्यावरती लाखो रुपये खर्च करण्यात आला परंतु ती कॅमेरे आता शहरात धूळखात व शोभेची वस्तु बनलेली दिसून येत आहे.
CCTV कॅमेरे नादुरुस्तीबाबतची माहिती वारंवार काही वृत्तपात्रांनी देखील उचलून धरली होती.
काही दिवस आगोदर काँग्रेस शहराध्यक्ष किरण देशमुख यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याविरुद्ध तक्रार करीत यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. वारंवार वृत्तपत्रांच्या माध्यमातून, सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कॅमेरेबाबत तक्रारी केल्या गेल्या पण आचासंहितेच्या नावाखाली काम होईल ते कुठले? अन् प्रशासनाला जाग येईल ते नवलच! एवढं होऊनही, प्रशासन काही जागे होईना? ते म्हणतात ना, कुंभकर्ण तो कुंभकर्णचं त्याला कसली जाग!
१ ऑगस्ट रोजी पत्रकारांच्या “चला निवडणुकीला सामोरे जाऊ या”….. या कार्यक्रमात याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर, सत्ताधाऱ्यांनी लवकरच आम्ही शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्ती करून जनतेला दिलासा देऊ असा शब्द सुध्दा दिला परंतु आज देखील ती कॅमेरे स्वतःच नजरकैदेत बंद असल्यासारखी आहेत. शहरातील CCTV कॅमेरे बसविले तेव्हापासून मेंटेनन्सच्या नावाखाली उकळलेला पैसा मलाई म्हणून कोणाच्या तरी घशात गेला? अशी चर्चा गांव वट्यावर होतांना दिसते आहे.
सीसीटीव्ही कॅमेरचा विषय आला तर पोलीस यंत्रणा सुद्धा हतबल झाल्याचे दिसते कारण एक अधिकारी काम करेना! अन् दुसरा अधिकारी काम सांगेना! ज्या पोलीस यंत्रणेला ज्या तिसऱ्या डोळ्याची गजर आहे तेच आता आचासंहिता संपण्याची वाट पाहत असावे. खरंतर, ज्या अधिकाऱ्यावर वारंवार प्रशासना व्यवस्थेची पारदर्शक्ता पाहण्याची गरज असते आता त्याच्यात नैतिकतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होताना दिसत आहे, अन् याच अधिकाऱ्यांच्या हातात शेगांवात येणाऱ्या पर्यटक, भक्त आणि गावातील नागरिकांची धुरा आहे येवढे मात्र खरे!
आचार सहिताचे घोगडे पडेल उपयोगी
जेव्हा ‘ त्यांची ‘ माणसे घरी येवून सही मागतात तेव्हा…
राष्ट्रवादीचे नितीन कराळे यांचे सीसीटीव्ही कॅमेरा दुरुस्तीसाठी शहरातील गांधी चौक येथे उपोषण सुरू आहे. उपोषणकर्ते यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा CCTV बाबत न. प. च्या अधिकाऱ्यांना सूचना पत्र दिले तेव्हा त्याच्या काही दिवसात मुख्याधिकऱ्यांची माणसे उपोषणकर्ते नितीन कराळे यांच्या घरी जाऊन ” उपोषण करू नका आणि मी उपोषण करणार नाही ” अश्या आशयाच्या कागदावर सही घेण्यासाठी आले असल्याची धक्कादायक घटना सांगितली. न. प. च्या अधिकाऱ्याची माणसे यांना घरी जाण्याची वेळ का आली असावी? या सीसीटीव्ही कॅमेरा मेंटेनन्समध्ये भ्रष्टाचार तर झाला नसावा ना? असा सवाल देखील उपस्थित होतो. माणसे पाठवण्या ऐवजी तीच माणसे कॅमेरा दुरुस्तीच्या कामात लावली असती किंवा त्याचा पाठपुरावा केला असता तर आज ही न. प. ला नामुष्कीची वेळ सावरता आली असती.