प्रतिनिधी – उमेर सय्यद / अहमदनगर – अहमदनगरकरांच्या पाणीपट्टीत शे-दोनशे नव्हे तर तब्बल एक हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नगरकरांना १५०० ऐवजी २५०० रुपये पाणीपट्टी भरावी लागणार आहे. स्थायी समितीने तब्बल पंधरा वर्षानंतर पाणीपट्टीत प्रचंड वाढ केल्याने नगरकरांची झोप उडाली आहे.
महापालिका स्थायी समितीचे बहुतांश सदस्य निवृत्त झाल्यानंतर उरलेल्या सहा सदस्यांनी हा निर्णय घेतल्याने त्याला राजकीय महत्वप्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभा आणि प्रशासनाची यासंबंधीची भूमिका काय असेल, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. नगरला पूर्वी ८०६ रुपये पाणी पट्टी होती. २००३ मध्ये त्याध्ये वाढ करण्यात येऊन १५०० रुपये करण्यात आली. त्यानंतर आलटूनपालटून सर्वच पक्ष सत्तेवर येऊन गेले. मात्र, कोणीही पाणीपट्टीत वाढ़ केली नाही. तब्बल १५ वर्षांनंतर आता पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या आदेशानेच पाणीपट्टी वाढविण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.