चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )
सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून मंत्रिगट व सुकाणू समिती यांच्यात झालेल्या चर्चेअंती सरसकट कर्जमाफीची मागणी सरकारने मान्य केली होती. त्यामुळे सुकाणू समितीने नियोजित आंदोलनाला स्थगिती दिली होती. मात्र सरकारचा शेतकरीविरोधी धोरण लक्षात घेऊन फसवी कर्जमाफीचा निषेध करीत सुकाणू समितीने आज १४ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी ‘रास्ता रोको’ चा निर्णय घेतला आहे. अशातच चांदुर रेल्वे शहरात विरूळ चौकात आज सोमवारी १२ वाजता सुकाणू तालुका समिती तर्फे रास्तारोको करण्यात येणार आहे. या रास्तारोको मध्ये प्रहार शेतकरी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र किसान सभा, आम आदमी पार्टी या पक्ष, संघटनांचा सहभाग राहणार आहे
सदर आंदोलनात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व पुढील पिकासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे, डॉ.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करावे, शेतमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा या आधारे भाव द्यावा, शासकीय खरेदीची व्यवस्था करावी, वन्यप्राण्यांमुळे पिकांचे झालेल्या नुकसानीचे ७५ हजार रुपये द्यावे, वनविभागाला तारकंपाऊंड घालावे व पीकविम्याच्या निकषात वन्यप्राण्यांच्या नुकसानीचा समावेश करावा आदी मागण्यांचा समावेश आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रभुराज इंगळे, कॉ. विनोद जोशी, कॉ. देविदास राऊत, नितीन गवळी, कडु, सौरभ इंगळे, विजय रोडगे, पेठेसह सुकाणू तालुका समितीतर्फे करण्यात आले .