चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-
सगळीकडे अनेक समस्यांच्या मागण्या अनेकजण करतांना बघितली आहे. मात्र शहरातील रेल रोको कृती समितीच्या सदस्यांनी एक आगळीवेगळी मागणी केल्याचे समोर आले आहे. वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस चांदुर रेल्वे शहरात थांबत नसल्यामुळे खासदारांचा थांबा चांदुर रेल्वे शहरात देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.
निवेदनात नमुद केल्याप्रमाणे, खासदार रामदास तडस हे भाजपातर्फे वर्धा लोकसभा मतदार संघातुन निवडुन आले आहे. या लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत धामणगाव- चांदुर रेल्वे मतदार संघ येतो. खासदार रामदास तडस निवडुन आल्यापासुन शहरवासी रेल्वे थांब्याची मागणी त्यांच्याकडे करीत आहे. आश्वासन दिल्यानंतर साडेतीन वर्ष लोटुनही अद्यापही रेल्वे गाड्यांचे थांबे मिळालेले नाही. यापुर्वी शहरवासीयांनी 15 ऑक्टोंबर 2012 ला रेल रोको आंदोलन केले होते. त्यानंतर आता दिल्ली व नागपुर रेल्वे बोर्डात निवेदन देऊन रेलेवो थांब्याची मागणी केली होती. दिवाळीच्या शुभमुहुर्तावर सुरू झालेल्या काझीपेठ-पुणे गाडीला सुध्दा केवळ चांदुर स्टेशवनरच थांबा देण्यात आलेला नाही. गाड्यांना थांबे मिळत नसल्यामुळे खासदार रामदास तडस सुध्दा शहरात येत नाही आहे. त्यामुळे शहरवासीयांची आता ही भावना झाली आहे की, मागणी केलेल्या रेल्वे गाड्या तर थांबतच नसुन खासदार रामदास तडस सुध्दा शहरातुन सुपरफास्ट निघुन जात आहे व खासदारांना विकास कामात सुध्दा कोणतीही रूची दिसत नाही आहे. त्यामुळे खासदार रामदास तडस जे सुपर बुलेट ट्रेन प्रमाणे चांदुर रेल्वे वासीयांना सोडुन धावत आहे त्यांना समझ देऊन त्यांचा चांदुर रेल्वेला थांबा द्यावा तसेच रेल्वे मंत्रालयाला सुचित करून शहरवासीयांची असलेली रेल्वे थांब्याची मागणी पुर्ण करावी अशी मागणी रेल रोको कृती समितीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवुन करण्यात आली आहे.
निवेदन पाठवितेवेळी रेल रोको कृती समितीचे नितीन गवळी, कॉ. विनोद जोशी, मेहमुद हुसेन, कॉ. देविदास राऊत, राजेश खांडपासोळे, अशोक मोहोड, अजय चुने, कॉ. विजय रोडगे, राजाभाऊ भैसे, बंडुभाऊ यादव, कॉ. रामदास कारमोरे, विनोद लहाने, पंकज गुडधे, भीमराव खलाटे, महादेवराव शेंद्रे, गौतम जवंजाळ, संजय डगवार, सौरभ इंगळे, गोपाल मुरायते आदी उपस्थित होते.