नवी देहली – लोक चित्रपटगृहांमध्ये मनोरंजनासाठी येतात. समाजाला त्याची आवश्यकता आहे. चित्रपटगृहांमध्ये वाजवल्या जाणार्या राष्ट्रगीताच्या वेळी देशभक्ती दर्शवण्यासाठी उभे रहाणे आवश्यक नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. तसेच चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्यावर नियंत्रण आणण्यासाठी नियमांमध्ये संशोधन करण्यावर विचार करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. जर कोणी राष्ट्रगीताच्या वेळी उभे रहात नसेल, तर त्याला ‘अल्प देशभक्त’ असे म्हणू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने पुढे म्हटले की, समाजाला नैतिक पहार्याची आवश्यकता नाही. उद्या सरकारला वाटेल की, चित्रपटगृहांमध्ये नागरिकांनी ‘टी शर्ट्स्’ आणि लहान पॅन्ट घालून येऊ नये, कारण यामुळे राष्ट्रगीताचा अवमान होतो. सरकारला आम्ही आमच्या खांद्यावरून बंदूक चालवायला देणार नाही. अपेक्षा असणे एक गोष्ट आहे, तर बंधनकारक करणे दुसरी गोष्ट आहे. न्यायालय त्याच्या आदेशाने लोकांमध्ये देशभक्ती भरू शकत नाही.