मुंबई – ‘पद्मावती’ चित्रपटाच्या माध्यमातून चुकीचा इतिहास समोर आणला जात आहे. त्यामुळे या सिनेमातील केवळ दृष्ये काढून चालणार नाही, तर या चित्रपटावरच बंदी आणा. हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी. जर चित्रपट प्रदर्शित झाला, तर सरकारला राजपूत समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. या चित्रपटावर बंदी घातली नाही, तर १७ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांचा बंगल्यावर मोर्चा काढू, अशी चेतावणी महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष श्री. अजयसिंह सेंगर यांनी दिली आहे. याविषयी १ नोव्हेंबर या दिवशी महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. ‘या प्रकरणी लक्ष घालीन’, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनाही निवेदन देण्यात आले. रावल यांनी ‘या चित्रपटाविषयी ‘सेन्सॉर बोर्डा’शी बोलून घेतो. चित्रपट प्रदर्शित न करण्याविषयी मागणी करण्यात येईल’, असे आश्वासन हिंदुत्वनिष्ठांना दिले.