यवतमाळ : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वात शनिवारी यवतमाळमध्ये शिक्षकांनी महामोर्चा काढला असुन त्यांनतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
येथील जिल्हा परिषदेजवळून दुपारी १ वाजताच्या सुमारास या महामोर्चाला सुरु वात झाली. बसस्थानक चौक, नेताजी चौक, पोलीस ठाणे, पाच कंदील चौक, महात्मा फुले चौक मार्गे हा मोर्चा तिरंगा चौकात पोहोचला. तेथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. समन्वय समितीचे पदाधिकारी राजूदास जाधव, मधुकर काठोळे, ज्ञानेश्वर नाकाडे, रमाकांत मोहूरकर आदींनी सभेला संबोधित केले. आॅनलाईन चुकांची दुरुस्ती केल्यानंतरच शिक्षकांच्या बदल्या कराव्या, २००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.