राममंदिर बांधण्यासहित मथुरा, काशी येथील मंदिरांना मुक्त करून दाखवणे हेच खरे शौर्य ठरणार आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे !
लक्ष्मणपुरी – विश्व हिंदु परिषदेकडून ६ डिसेंबर हा बाबरी मशीद पाडल्याचा २५ वा स्मृतीदिन साजरा करण्यात येत आहे. हा दिवस शौर्यदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राममंदिराच्या आंदोलनात प्राणार्पण करणार्या कारसेवकांचे स्वप्न मंदिर उभारणीनेच पूर्ण होईल, असे विहिंपने म्हटले आहे.
विहिंपचे अवध विभागाचे माध्यम प्रमुख अंबुज ओझा यांनी सांगितले की, विहिंप प्रमुख अशोक सिंघल, गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिराचे माजी मुख्य धर्मगुरु महंत अवैद्यनाथ, रामजन्मभूमी न्यासाचे माजी प्रमुख महंत श्री रामचंद्र दास परमहंस आणि कारसेवक यांनी या आंदोलनात मोठा त्याग केला होता. त्यांचे स्वप्न राममंदिराच्या उभारणीतून पूर्ण होईल.
उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले की, राममंदिर व्हावे ही भक्तगणांची इच्छा आहे. भगवान रामाची अवस्था सध्या वादग्रस्त वास्तू होती तेव्हासारखीच आहे. प्रतिदिन तेथे पारंपरिक पूजाअर्चा केली जाते; पण रामलल्लाची मूर्ती तात्पुरत्या स्वरूपाच्या मंदिरात असून ती भव्य मंदिरात प्रतिष्ठापित करण्याची रामभक्तांची इच्छा आहे.