रतलाम – हिंदू जागे झाले आहेत. निकाल हिंदूंच्या बाजूनेच लागेल. निकाल हिंदूंच्या बाजूने लागावा यासाठी हिंदू नक्की प्रयत्न करतील. न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभेत आमचे लोकप्रतिनिधी आहेत, ते नवा कायदा आणतील आणि अयोध्येत राममंदिरच बांधले जाईल. या प्रयत्नात यश मिळाले नाही, तरी कोट्यवधी हिंदूच एकत्र येतील आणि मंदिर बांधतील, असे विधान भाजप खासदार आणि मध्यप्रदेश पर्यटन विकास मंडळाचे अध्यक्ष तपन भौमिक यांनी केले. पुढील वर्षी दिवाळीपर्यंत मंदिराचे काम चालू होईल, असा दावा त्यांनी केला. रतलाममध्ये एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. याविषयी भौमिक यांनी एका वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीला सांगितले की, मी वादग्रस्त विधान केले आहे, असे मला वाटत नाही. जर न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला नाही, तर आम्ही संसदेत राममंदिरासाठी कायदा आणू. ते जमले नाही तरी हिंदू राममंदिर बांधणारच, एवढेच मला सांगायचे होते.
भौमिक यांच्या विधानावर काँग्रेसचे प्रवक्ता के.के. मिश्रा यांनी टीका केली. भौमिक यांचे हे वैयक्तिक मत आहे कि पक्षाचे हे भाजपने स्पष्ट करावे आणि जर ते वैयक्तिक मत असेल, तर त्यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मिश्रा यांनी केली.