वाशीम –
पावसाची कमी सरासरी, शेतीचा वाढता उत्पादन खर्च, जिवघेणी महागाई या चक्रात सापडलेल्या शेतकर्यांना तारण्यासाठी वाशीम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली असून आज 11 डिसेंबर रोजी आपच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की, यावर्षी वाशीम जिल्हयात कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप हंगाम पिकला नाही. त्यातच दुबार पेरणीचे संकट कोसळले व रब्बी हंगाम सुध्दा पिकला नाही. परिणामी उत्पादन खर्च वाढून शेतकरी कर्जबाजारी झाला असून जीवघेण्या महागाईमुळे तो मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या शेतकरी, शेतमजूरांची आर्थिक़ स्थिती हातघाईची झाली आहे. सरकारने शेतकर्यांच्या परिस्थितीचे सर्वेक्षण करुन वाशीम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करावा. आणि शेतकर्यांना दिल्ली राज्य सरकारने दिलेल्या मदतीप्रमाणे प्रति हेक्टरी पन्नास हजाराची मदत जाहीर करावी. तसेच शेतमजूरांकरीता योग्य त्या सुविधा द्याव्यात व हवालदील जनतेला दिलासा द्याव्या. अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. निवेदनावर सुरेश सातरोटे, अॅड. गजानन मोरे, राजेश गिरी, मोहन महाले, ज्ञानेश्वर महाले, विनोद पट्टेबहादुर, राम पाटील डोरले, प्रदीप पेंढारकर, अमीन कलरवाले, गणेश वाघमारे, गोपाल परांडे आदी आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.