सत्ता देणार्या रामालाच भाजप विसरला ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

0
530
Google search engine
Google search engine

आगरा – ज्या रामाच्या नावामुळे भाजप सत्तेत पोहोचला, आज त्या रामालाच भाजप विसरला आहे. केंद्रामध्ये सत्तेत येऊन साडेतीन वर्षे होत आली आहेत आणि उत्तरप्रदेशमध्येही सत्तेत येऊन एक वर्ष होत आले आहे; मात्र अजून राममंदिर उभारणीचा कोणताही मार्ग काढण्यात आलेला नाही. सरकार हा वाद सोडवण्याऐवजी तो अधिक जटील करत आहे. अशामुळे राममंदिराची उभारणी होणे कठीणच वाटते, अशा शब्दांत द्वारका आणि ज्योतिष पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी भाजपवर टीका केली.
भारतात जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती हिंदू नाही !
शंकराचार्य पुढे म्हणाले, भारतात जन्म घेतल्याने कोणी हिंदू होत नाही. आम्हाला केवळ संस्कृतीने नाही, तर धर्माने हिंदू असणारे अपेक्षित आहेत. कोणी व्यक्ती वेद आणि हिंदु धर्मशास्त्र यांना मानतच नसेल, तर ती हिंदू असू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर नाव न घेता टीका केली. सरसंघचालकांनी काही दिवसांपूर्वी भारतात रहाणारी प्रत्येक व्यक्ती हिंदु आहे, असे म्हटले होते.
अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत समाविष्ट करावे
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये रामायण आणि महाभारत यांचे शिक्षण देण्याची आवश्यकता या वेळी प्रतिपादित केली. शंकराचार्य म्हणाले, जर आधुनिक शिक्षणाबरोबर पौराणिक कथांचे ज्ञान मिळाले, तर युवकांना लक्षात येईल की, वाईट कर्म केल्याचे फळ वाईटच मिळते. रामायण आणि महाभारत यांना अभ्यासक्रमात समाविष्ट केले, तर विद्यार्थ्यांना मोठे शिक्षण मिळेल.