बाजार समितीला विश्वासात न घेता परस्पर नियुक्त्या करण्याच्या शासनाच्या निर्णयाला चपराक बसली आहे
बीड: नितीन ढाकणे
दि.15 ………………..परळी कृषी उत्पन्न बाजार समितीवर स्वीकृत संचालक म्हणुन श्री. ज्ञानोबा फड, श्री. रामभाऊ कोपनर यांच्या शासनाने केलेल्या निवडीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे या दोघांसह सरकारलाही हा धक्का मानला जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीवर स्वीकृत तज्ञ संचालक म्हणून निवड करणेबाबत परळी कृषी उत्पन्न बाजार समितीने मुंजाजी आश्रोबा सोनवणे व मारूती रामराव कराड यांची नावे सूचविली होती मात्र शासनाने मार्केट कमिटीच्या या प्रस्तावाचा विचार न करता श्री रामभाऊ कोपनर व ज्ञानोबा फड यांची स्वीकृत संचालक म्हणून निवड जाहीर केली. या निवडीस श्री. सोनवणे व श्री. कराड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर मा. उच्च न्यायालयाच्या श्री.आर.एम.बोरडे व श्री.के.के. सोनवणे यांच्या खंडपीठाने सरकारच्या नियुक्तीस स्थगिती दिली असून, श्री.कोपनर व श्री.फड यांना संचालक म्हणून काम करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे या दोघांना धक्का बसला असून, बाजार समितीला विश्वासात न घेता परस्पर नियुक्त्या करण्याच्या शासनाच्या निर्णयाला चपराक बसली आहे. या प्रकरणी अर्जदारांच्यावतीने अॅड. सिध्देश्वर ठोंबरे यांनी काम पाहीले. अॅड.अशोक कवडे (अंबाजोगाई) यांनी त्यांना सहकार्य केले.