श्री संदीप बाजड / अमरावती :-
उन्हाळ्याच्या तडाख्यात मोर्शी तालुक्यातील खेड, उदखेड, लाडकी, खोपडा, बोडना या संपूर्ण गावातील विहिरीतील पाणी आटल्यामुळे नागरिकांसह गुरा-ढोरांना पिण्याचे पाणि उपलब्ध होत नसल्याचे पाहून चारगड – १ धरणातून चारगड नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी अनेक दिवसांपासून गावकऱ्यांच्या वतीने मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ.अनिल बोंडे यांनी केली होती. परंतु जिल्हा परिषद कार्यालयातून टाळाटाळ होत असल्याचे पाहून आज पाण्याच्या न्यायासाठी आ.डॉ.अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.
या आंदोलनामध्ये जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेता रवींद्र मुंदे, सदस्य प्रा.संजय घुलक्षे, सारंग खोडस्कर, जिल्हा मोर्शीचे पंचायत समिती सदस्य भाऊराव छापाने, मोर्शी आत्मा अध्यक्ष देवकुमार बुरंगे, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आदित्य बिजवे, वरुड युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष आशिष सोनारे, सामाजिक कार्यककर्ते पवन देशमुख यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चारगड नदी पात्रातून पाणी सोडण्यासाठी होत असलेल्या आंदोलनाची जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. परंतु ग्रामीण भागातील जनतेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आ.डॉ.अनिल बोंडे यांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जिल्हा परिषदेचे प्रशासन व सरकार या ठिय्या आंदोलनाचा धसका घेत खळबळून जाग झालं असल्याचं चित्र यावेळी जिल्हा परिषद परिसरात पहावयास मिळालं आहे.