सांगली / हेमंत व्यास :/
पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून कोणती भूमिका घ्यायची याबाबत स्पष्ट आदेश अद्याप आलेले नाहीत. पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करुन अर्ज माघारीनंतर आम्ही आमच्या गटाची भूमिका स्पष्ट करु, असा खुलासा क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुणअण्णा लाड यांनी बोलताना केला आहे. देशमुख व लाड कुटुंबांचे कौटुंबिक संबंध आहेत, हे संग्रामसिंह देशमुख यांचे वक्तव्य बरोबर आहे त्यामध्ये गैर काय? असेही ते म्हणाले.
पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसचे विश्वजीत कदम यांच्याविरोधात भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. देशमुखांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पृथ्वीराज देशमुख आणि अरुणअण्णा हे दोन्ही नेते एका नाण्याच्या दोन बाजू असल्याचे स्पष्ट केले.
प्रत्येक निवडणुकीत देशमुख कुटुंबासोबत राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांचा गट असतो, लाड गटाला राष्ट्रवादी प्रदेशकडून अद्याप कोणत्याही सूचना मिळालेल्या नसल्याचे खुद्द अरुणअण्णांनीच स्पष्ट केले, त्यामुळे संग्रामसिंह देशमुखांच्या विधानाने राजकीय मंडळीमध्ये अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
लाड गट पोटनिवडणुकीत कोणती भूमिका घेणार याबाबत मतदारसंघात उत्सुकता निर्माण झाली आहे.
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघासाठी २८ मे रोजी निवडणूक आहे.