अनिल चौधरी, पुणे :
ठाणे येथील भूमी अभिलेखपाल कार्यालयातील अभिलेखपाल सुहास धवन यांच्याविरुद्ध तक्रारदार यांच्याकडे ५५००/- रुपयांची मागणी केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी कि, तक्रारदार यांना भूमी सर्वेक्षणाचा नकाशा व गटबुकाचा उतारा देण्यासाठी भूमिलेखपाल सुहास धवन यांनी तक्रारदार यांच्याकडे ५५००/- रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यापैकी १५०० रुपये यापूर्वी लोकसेवक यांनी स्वीकारले होते. उर्वरीत ४००० रुपये देणे बाकी होते.लाच दिल्याशिवाय आपले काम होणार नाही याची खात्री झाल्यानंतर तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारीची पडताळणी केली असता लोकसेवकाने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावरून एसीबी ठाणे यांनी सापळ्याचे आयोजन केले परंतु नमूद लोकसेवक यांनी सापळ्यावेळी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. म्हणून लोकसेवक सुहास धवन यांच्याविरुध्द लाचेची मागणी केल्यावरून ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा पुढील तपास ठाणे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अंजली आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करत आहेत.
कोणत्याही शासकीय, निमशासकीय ,खाजगी अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करत असतील तर नागरिकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री.क्रमांक १०६४ या नंबर करावी , तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येते असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.