सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देशभरात 112 ठिकाणी भावपूर्ण वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरे !
अमरावती – गुरूंचा स्थूल देह म्हणजे व्यष्टी रूप आणि संपूर्ण राष्ट्र म्हणजे गुरूंचे समष्टी रूप आहे. गुरुकार्याची कक्षा व्यक्तीच्या आध्यात्मिक उद्धारापासून समाज, राष्ट्र अन् धर्म यांच्या उत्थानापर्यंत रुंदावलेली असतेे. वैयक्तिक उद्धारापेक्षा समष्टी उत्कर्षासाठी कार्य करणार्यांवर गुरुकृपा अधिक होते. धर्मसंस्थापनेचे, म्हणजेच हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य हे व्यक्ती, समाज, राष्ट्र अन् धर्म या सर्वांचा उत्कर्ष साधणारे आणि काळानुसार आवश्यक असे गुरुकार्य आहे. या कार्यात स्वक्षमतेप्रमाणे तन-मन-धनाने सहभागी होणे, हीच काळानुसार खरी गुरुदक्षिणा ठरणार आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे योगेश मालोकार यांनी केले. ते ‘धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचे योगदान’ या विषयावर 16 जुलै या दिवशी अंबा मंगलम, महावीर नगर, सातुर्णा या ठिकाणी आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते. याचसमवेत अन्य समविचारी संघटनांसह यंदा देशभरात 112 ठिकाणी असे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरे झाले.
महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजन आणि सनातन संस्थेच्या गुरुपरंपरेतील श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद, श्री अनंतानंद साईश, सनातन संस्थेचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज, सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूसंघटनाचे अद्वितीय कार्य’ आणि ‘परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांचे अलौकिक कार्य’ या विषयांवरील लघुपट (व्हिडिओ) दाखवण्यात आला. या वेळी आपत्काळात समाजसाहाय्यासाठी आवश्यक ‘स्वरक्षण प्रात्यक्षिके’ दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला अनुप जयस्वाल सचिव देवस्थान सेवा समिती विदर्भ , अधिवक्ता राजेंद्र पांडे, विनीत पाखोडे अध्यक्ष नेरपिंगलाई संस्थांन आणि अजय सारसकर, मुकूल कापसे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज गणेशकर, हेमंत मालवीय, डॉ. ऋषिकेश सावदेकर, पवन शेंद्रे, अभय कडूकार, आनंद डाऊ, नरेंद्र खडसे, प्रदीप गर्गे, मनोज विश्वकर्मा, मिलिंद साखरे,नलिनी ठाकरे, बेला चव्हाण, संगीता जाधव, लता सातोटे असे ५०० हुन अधिक जिज्ञासू उपस्थित होते.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय ब्राम्हण महासभेचे जिल्हाध्यक्ष रमेश छांगाणी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात भारत या हिंदू राष्ट्रात हिंदुची दयनिय स्थिती आणि मंदिर रक्षा या विषयी आपले विचार मांडले. यंदाच्या वर्षी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मराठी, हिंदी, कन्नड, तमिळ, तेलगु, मल्ल्याळम्, गुजराती,पंजाबी, बंगाली, उडिया, आसामी या भारतीय भाषा, तसेच इंग्रजी आणि नेपाळी या विदेशी भाषा अशा एकूण 13 भाषांत ‘फेसबूक लाइव्ह’च्या माध्यमांतून गुरुपौर्णिमा महोत्सवांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या माध्यमांतून देश-विदेशांतील ५५ हजार भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला.