भाजयुमो प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांनी दिली माहिती
अमरावती – अथक प्रयासाने उभे राहणाऱ्या अयोध्या येथील प्रभू श्रीरामांचे मंदिर म्हणजे तमाम हिंदू बांधवांच्या श्रद्धेचा आणि आत्मीयतेचा विजय आहे. सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर अयोध्या येथील श्रीराम जन्म स्थानावर भव्य मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु या विषयाचे राजकीय टायमिंग साधत, “मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का?” असे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वादंग ओढावून घेतला आहे.त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना प्रभु श्रीरामांची आठवण करून देण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी “श्रीराम” असे लिहून शरद पवार यांना पत्र पाठवण्याच्या आंदोलनास आज पनवेल येथून प्रारंभ केला. देशातील तमाम हिंदू बांधवांच्या श्रद्धेचा विषय असणारे अयोध्या येथील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पाच सप्टेंबर रोजी होत आहे.त्याबद्दल सन्माननीय शरद पवार यांनी विवादात्मक विधान केले आहे. ते आमच्यासाठी सुद्धा सन्माननीय आहेत. परंतु एवढे मोठे जाणते आणि सन्माननीय नेते असे विधान चुकून करणे शक्यच नाही,त्यामुळे या विधाना पाठी कुठेतरी नागरिकांना भ्रमित करण्याचा आणि राजकारण करण्याचा विचार आहे असा आम्हाला संशय येतो. प्रभू रामचंद्र मंदिर उभारणीच्या बाबत जर कुणी नकारात्मक वातावरण तयार करणार असतील तर भाजपा युवा मोर्चा हे सहन करणार नाही. जे जे प्रभु रामचंद्रांचे नाव विसरतील त्यांना त्याची आठवण करून देण्याचे काम आम्ही करू. त्याच उद्देशाने अमरावती जिल्ह्यातून भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती जिल्हा ग्रामीण पाठविणार भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजयुमो प्रदेश प्रभारी संजय कोडगे यांच्या आवाहनानुसार, माजी पालकमंत्री अनिलजी बोन्डे यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता ताई दिघडे यांच्या नेतृत्वात मा.शरदचंद्रजी पवार यांना 20,000 “श्री राम” असे लिहिलेली पत्रे पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी धडणार आहेत अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्च्याचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांनी दिली.
सोपान कनेरकर यावेळी पुढे म्हणाले कि, राम मंदिर बांधल्याने कोरोना जात नाही, असे शरद पवार म्हणतात. तर मग ज्यामुळे कोरोना जातो अशा किमान चार गोष्ट तरी शरद पवार साहेबांनी आघाडी सरकारची शिकवणी घेऊन त्यांना शिकवाव्यात. म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचे कल्याण होईल असा खोचक टोला त्यांनी लगावला.
शरद पवार नक्कीच मोठे नेते आहेत परंतु प्रभू रामचंद्रांच्या विषयात कुणी असं नकारात्मक बोलणार असेल तर भारतीय जनता युवा मोर्चा हे कदापी खपवून घेणार नाही. प्रभू रामाची आठवण करून देण्याचे काम भारतीय जनता युवा मोर्चा नेहमीच करत राहील. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी भाजयुमो प्रदेश सचिव सोपान कनेरकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मनीष मेन संपूर्ण तालुकाध्यक्ष व भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते अथक प्रयत्न घेत आहे.