वरुड प्रतिनिधी: वरुड येथून जवळच असलेल्या झटामझीरी येथे आज सकाळी अकस्मात आग लागल्याने तीन घरांची राखरांगोळी झाली. रामकीसन उईके,महादेव इवनाते, जयवती तिडगाम यांचे घर आगीत पूर्णतः जळाल्याने या तिघांचे कुटुंब उघड्यावर आलेले आहे.
अचानक आग लागल्याने संसारोपयोगी साहित्य,धान्य, कपडे,कागदपत्रे ,शेतीचे अवजारे इ जळाल्याने रामकीसन उईके,महादेव इवनाते,जयवन्ती तिडगाम यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. गावातील तरुणांनी सतर्कता दाखवत आग विझवण्याचे प्रयत्न केले.
या घटनेची माहिती होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत महसूल अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामा करून आगग्रस्तांना आर्थिक सहाय्य देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्रदीप सिरसाम, राजेंद्र भुयार, हिरकांत उईके,निलेश पाटील,पत्रकार आकाश वाडीवे, मारोती गजाम, चेतन वाडीवे,प्रवीण कुमरे,दिनेश नवडेक,सुधाकर धुर्वे, पंडित खातरकर,रोशन कोहळे,राज राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.