अमरावती, दि. १८ : जिल्ह्यात काही ठिकाणी अतिपावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
अमरावती तालुक्यात शिराळा, ब्राम्हणवाडा भगत, देवरा पुनर्वसन तसेच इतर काही परिसरात अतिपावसामुळे पीकनुकसान व इतर हानी झाली आहे. या नुकसानाबाबत
दक्षतापूर्वक व तपशीलवार पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी दिले आहेत.
जिथे नुकसान झाले असेल त्याठिकाणी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पोहोचून पंचनामे करावेत. गावात शेतकरी बांधवांशी संवाद साधून परिपूर्ण माहिती घ्यावी व सर्व क्षेत्राची पाहणी करावी. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पंचनामे अचूक व सविस्तर करावेत. ही कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी. एकही नुकसानग्रस्त शेतकरी बांधव भरपाईपासून वंचित राहता कामा नये, असे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
अमरावती तालुक्यात शिराळा, ब्राम्हणवाडा भगत, देवरा पुनर्वसन आदी परिसरात अतिपाऊस झाला. याबाबत प्रत्यक्ष पाहणी व आवश्यक कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार संतोष काकडे यांनी दिली.
०००