अमरावती : खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांचा अपमान केला जात आहे. ज्या महाविकास आघाडीच्या मतांवर त्या निवडून आल्या, त्यांच्याविरुद्ध सुद्धा भूमिका राणा दाम्पत्यांकडून घेतली जात आहे, याचा निषेध म्हणून राणा दाम्पत्याविरुद्ध होणाऱ्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे तशी घोषणा पश्चिम विदर्भाचे सचिव सागर देशमुख यांनी करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करत खासदार नवनीत राणा ज्य प्रमाणे जनतेची दिशाभूल करत आहेत, ती बाब जनतेच्या समोर आणली म्हणून त्यांच्याविरुद्ध महिलांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याचा निषेध म्हणून २ मे रोजी आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पश्चिम विदर्भ सचिव सागर देशमुख यांनी पाठिंबा जाहीर केल्याची घोषणा गुरुवारी केली आहे. तसे प्रसिद्धिपत्रक त्यांनी जारी करत मोर्चात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ज्या भारतीय जनता पक्षाचा अजेंडा व झेंडा राणा दाम्पत्याने हाती घेतला आहे, त्या भाजप पदाधिकाऱ्यांनी सुद्धा राणा दांपत्याची नौटंकी जनतेसमोर आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचा खोटारडेपणा अधिककाळ जनता सहन करणार नाही, असेही सागर देशमुख यांनी म्हटले आहे. राजेश वानखडे यांच्याविरुद्ध जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे ते तत्काळ रद्द करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. २ में रोजी निघणाऱ्या आक्रोश मोर्चात आपण स्वताही सहभागी होणार असल्याचे त्यांनी माध्यमांना कळविले आहे.
—
Home आपला विदर्भ अमरावती राणा दाम्पत्याविरुद्धच्या भीम आर्मीच्या आंदोलनाला युवासेनाचा पाठिंबा – सचिव सागर देशमुख यांची...