पुणे-
भारत आणि चीन सीमेवर अनेक दिवसांपासून तणावाची स्थिती निर्माण झाली असून चीनने सीमेवर रणगाडे आणून त्यांचा सरावही चालू केला. कुरापतखोर अरुणाचल प्रदेश आणि लडाख येथे सीमावाद चालू ठेवण्यासमवेत आता सिक्कीममध्येही घुसखोरी करत डोकलाम हा चीनचा भूभाग असल्याचे चीन सांगत आहे. असे असतांनाही भारत चीनशी व्यापार वाढवत आहे आणि चिनी ‘ड्रॅगन’ भारताच्या घराघरांत पोहोचवत आहे. चिनी ‘ड्रॅगन’ला रोखण्यासाठी देशवासियांनीही चिनी वस्तू आणि चिनी राख्या यांवर बहिष्कार घालावा, स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरावा. केंद्र शासनाने चीनशी असलेल्या व्यापारविषयक धोरणांवर पुनर्विचार करून चीनची आर्थिक नाकेबंदी करावी, अशा प्रखर मागण्या हिंदु जनजागृती समिती प्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या आंदोलनाच्या वेळी करण्यात आल्या. येथील मंडई भागातील लोकमान्य टिळक पुतळा चौकात २३ जुलै या दिवशी हे आंदोलन करण्यात आले. या वेळी धर्माभिमानी सौ. प्रतिमा पासलकर, धर्मप्रेमी अधिवक्त्या ललिता नारगोलकर, सनातन संस्थेच्या डॉ. ज्योती काळे, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी आणि रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांच्यासह १२० हून अधिक राष्ट्रप्रेमी आणि धर्माभिमानी महिला उपस्थित होत्या. या वेळी राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानाला अनेक युवक, युवती आणि महिला यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.