चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) –
सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. सरकारच्या मंत्रीनगर व सुकाणू समितीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये सरसकट कर्जमाफीची मागणी सरकारने मान्य केली होती. त्यामुळे सुकाणू समितीने तीव्र आंदोलनाला तात्पुरती स्थगीती दिली होती. मात्र यांनतर विशेष प्रकारच्या अटी व शर्ती लावून शेतकर्यांना कर्जमाफीपासून कसे वंचित ठेवता येईल, याचाच प्रयत्न सरकारने केला. यामुळे सुकाणू समिती तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. अश्यातच चांदुर रेल्वे शहरात सुध्दा सुकाणू समितीतर्फे १४ ऑगस्टला विरूळ चौकात दुपारी १२ वाजता रास्तारोको करण्यात आले.
या आंदोलनामध्ये सर्वप्रथम कॉ.विनोद जोशी यांच्या राम नगर येथील निवास्थानापासून गाडगेबाबा मार्केट मधून विरूळ चौकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यांनतर विरूळ चौकात सोमवारी दुपारी १२ वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यांनतर एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आम आदमी पार्टीचे अमरावती संयोजक नितीन गवळी, कॉ. विजय रोडगे, कॉ. देविदास राऊत, प्रीतम खरबडे, कॉ. विनोद जोशी, संजय डगवार आदींची भाषणे झाली. यामध्ये सर्वांनी मागण्या मान्य होईपर्यंत लढत राहणार असल्याचे सांगितले. या दरम्यान आमदार बच्चू कडूंनीही धावती भेट दिली. या आंदोलनांमुळे काही वेळ वाहतूक थांबली होती.
या आंदोलनात शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी करावी, पुढील पिकाकरीता बिनव्यापी कर्ज सरकारने द्यावे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करून शेतकर्याला उत्पादन खर्च व ५० टक्के नफा एकत्र करून आधारभाव जाहीर करावा, प्राण्यापासून पिकांचे नुकसानी दाखल शासनाने दर हेक्टरी ७५ हजार रूपये नुकसान भरपायी द्यावी, वन विभागाच्या सिमा कंपाउंड घालुन बंद करण्यात व शेतकर्याच्या शेतीला तारेचे कुंपन द्यावे तसेच पिक विमा निकषात वन्य प्राण्याच्या नुकसानीचा समावेश करावा इ. मागण्याचा समावेश होता. यावेळी सायंकाळपर्यँत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनांमध्ये कॉ. विनोद जोशी, कॉ. देविदास राऊत, कॉ.सागर दुर्योधन, प्रभुराज इंगळे, नितीन गवळी, सुधीर सव्वालाखे, भीमराव खलाटे, आसोले, संजय डगवार, सौरभ इंगळे, विनोद लहाने, प्रदीप नाईक, पंकज गुडधे, पेठे, शंकरराव आंबटकर, कडू, कॉ. विजय रोडगे, शेळके, प्रीतम खरबडे, प्रदीप खेरडे, सचिन इमले, विक्रम तायडे, पंकज गिरीपुंजे, शुभम पाटील, प्रफुल्ल मारोटकर, महेंद्र कर्से, मयूर देशमुख, अमेय नेवारे, अमोल ठाकरे, भगवंतराव वाघ यांसह अनेक सुकाणू समितीचे कार्यकर्ते, शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.