मुंबई :- पहिल्या टप्प्यात मतदान पार पडलेल्या ३ हजार ८८४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून बहुतांश ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. विजयीझालेल्या सर्व उमेदवारांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे. ग्रामीण विकासात ग्रामपंचायतीचे योगदान महत्वपूर्ण आहे. ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था मधील महत्वाचा टप्पा असून लोकशाही निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून पंचायत राज्य व्यवस्था बळकट करण्यासाठी ग्रामपंचायतीची निवडणूक महत्वाची मानली जाते. परंतु ग्रामपंचायत निवडणुक ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसल्याने यातील विजयावर कोणत्याही पक्षाला ठामपणे दावा करता येणार नाही. ही निवडणूक स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून लढवली जाते. तरीही स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्या बळावर या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने घवघवतीत यश मिळविले आहे. राज्यातील दुसऱ्या टप्प्यात १६ जिल्ह्यांतील ३ हजार ६९२ ग्रामपंचायतींसाठी मतदान अजून बाकी आहे. या निवडणुकीतही काँग्रेस पक्ष चांगली कामगिरी करेल असा दावा खा.अशोक चव्हाण यांनी केला आहे. या निकालावर दृष्टीक्षेप टाकला असता भाजपाचा राज्यातून परतीचा प्रवास सुरु झाल्याचे प्राथमिक चित्र दिसत आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.