अहमदनगर,/ उमेर सय्यद- सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे आणि पावसाळ्यात पुढील कामांच्या सर्व प्रकारच्या प्रशासकीय पूर्तता करुन पावसाळ्यानंतर कामांना सुरुवात करावी, असे निर्देश राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या. खड्डेमुक्त महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले.
यावेळी श्री. पाटील यांनी जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या विविध कामांची माहिती घेतली. खड्डेमुक्त महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामामध्ये जिल्ह्याने चांगले काम केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
राज्यात 40 हजार किलोमीटरचे रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी 2 हजार 400 रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. याशिवाय, दहा किलोमीटरच्या रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीच वार्षिक करार पद्धतीने कामे दिली आहेत. त्या रस्त्यांवर खड्डे पडले अथवा रस्ते खराब झाले तर त्याच्या दुरुस्तीची अट संबंधित ठेकेदारावर टाकण्यात आली आहे. तसेच यापुढे दहा किलोमीटर अशा लांबीच्या रस्त्यांवर कामे करताना प्रत्येक ठिकाणी कोणत्या प्रकारचे काम करणे आवश्यक आहे, हे पडताळून त्यापद्धतीने कामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. येत्या अर्थसंकल्पात नमूद असणारी कामे नोव्हेंबरमध्ये सुरु होतील, हे पाहावे आणि सध्याची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.