बचतगटांच्या वस्तूंना व्यावसायिक बाजारपेठ मिळण्यासाठीच सिध्दा महोत्सव – ना. पंकजाताई मुंडे
सरस महोत्सव सिध्दाचे औरंगाबाद येथे थाटात उद्घाटन ; प्रदर्शनात दोनशे बचतगटांचा उत्स्फूर्त सहभाग
बीड:
दिपक गित्ते,नितीन ढाकणे
दि.२५——-राज्याच्या सर्वांगिण प्रगतीमध्ये महिलांचे सक्षमीकरण हा घटक महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने महिला बचत गटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा, माझी कन्या भाग्यश्री योजना, अस्मिता योजना यासह इतर अनेक उपयुक्त योजनांच्या माध्यमातून शासन महिलांच्या सन्मानित, स्वयंपूर्ण, आरोग्यदायी अस्तित्वासाठी कृतिशिल असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी येथे केले.
औरंगपूरा येथील जिल्हा परिषद मैदानावर राज्य सरकारच्या ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने आयोजित महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादित वस्तूंचे विभागस्तरीय विक्री व प्रदर्शन ‘सरस महोत्सव सिद्धा 2018’ चे उद्घाटन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी मधुकर राजे अर्दड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशव तायडे, सभापती विलास भुमरे, सभापती मीनाताई शेळके, सभापती कुसुम लोहकरे, उपआयुक्त सूर्यकांत हजारे, प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
*योजना सुरू करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य*
———————-
ग्रामीण भागातील महिलांपर्यत प्रगतीच्या संधी पोहचवण्याच्या उद्देशाने शासन भरीव प्रयत्न करत आहे. 100 टक्के कर्ज फेड करणाऱ्या महिला बचत गटांना शुन्य टक्के व्याजदाराने कर्ज पुरवठा करणारी सुमतीबाई सुकळीकर उद्योगिणी महिला सक्षमीकरण योजना सुरु करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून राज्यातील 1 लाख 7 हजार 381 बचत गटांना 36 कोटी निधीची तरतूद शासनाने केली असल्याचे ना. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट हा एक उत्तम पर्याय असून महिला बचत गटांद्वारे उत्पादित मालाला व्यावसायिक बाजारपेठ उपलब्ध करुन देणार सरस सिद्धा सारखी प्रदर्शने ही निश्चितच उपयोगी ठरणारी आहे, असे सांगून ग्रामीण भागातील कला कौशल्याला महिला बचत गटांच्या उत्पादानाच्या माध्यमातून मोठ्या बाजारपेठेत मागणी मिळवून देण्याच्या दृष्टीने बचत गटांना तांत्रिक प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्याद्वारे या बचत गटांची उत्पादने अधिक दर्जेदार, गणवत्तापूर्ण होण्याचे प्रमाण वाढत असलयाचे दिसून येत आहे. आर्थिक सक्षमीकरणासह शासनाच्या ग्रामविकास, जिल्हा परिषद, आरोग्य, शिक्षण व इतर विभागांच्या योजनांचा व्यापक प्रसार, प्रचार करण्यात, ग्रामीण परिसरात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात महिला बचत गटांची भूमिका प्रभावी ठरणारी आहे. त्यादृष्टीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात शौचालय बांधणी, त्याचा वापर करण्याची मानसिकता वाढवण्याचे काम महिला बचत गटांनी करावे, असेआवाहन त्यांनी केले. किशोरवयीन मुली, महिला यांच्या आरोग्यदायी जीवनासाठी शासनाने ‘अस्मिता – स्वच्छता व आरोग्याचा आयाम’ या उपयुक्त योजनेचा शुभारंभ केला असून 5 रु. शुल्कातून वर्षभरात 13 नॅपकीन संच देण्यात येणार आहे. यामध्ये महिला बचत गटांना प्रोत्साहन तसेच महिलांमधील अवघडलेपण दूर करण्यासाठी महिलांची महिलांसाठी अशा स्वरुपात ही योजना ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे. येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत सर्व ग्रामीण भागापर्यत या योजनेद्वारा सॅनेटरी नॅपकीन पोहचवल्या जातील, असे ना.पंकजाताई मुंडे यांनी यावेळी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यावेळी महिला बाल विकास विभाग महिलांच्या सक्षमीकरणाच्या अनेक लोकोपयुक्त योजना यशस्वीरित्या राबवित असल्याचे सांगितले.
याप्रसंगी ना. पंकजाताई मुंडे व मान्यवरांच्या हस्ते विभागातून उत्कृष्ट म्हणून निवड झालेल्या तीन स्वयंसहाय्यता गटांना ‘राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम’ देऊन गौरविण्यात आले. तसेच विशेष उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल बँक अधिकारी, योजनेची व्यापक प्रसिद्धी केल्याबद्दल पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.
*बचतगटांचा उत्स्फूर्त सहभाग*
——————————
या प्रदर्शनात खाद्य पदार्थ, आयुर्वेदिक उत्पादने, हस्तक
ला, घरगुती मसाले, लोणचे, ग्रामीण रानमेवा, पारंपारिक वस्तू यासह महिला बचत गटांद्वारे उत्पादित विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातील विविध जिल्हयातील 200 स्वयंसहाय्यता महिला बचतगटांनी सहभागी होत 180 स्टॉल लावलेले आहेत. हे प्रदर्शन 31 मार्च पर्यंत विनाशुल्क खुले आहे.