हिंदूंनो, तुम्ही संघटित न झाल्यास मालेगावमधूनही पिटाळले जाल ! – आमदार टी. राजासिंह, भाग्यनगर

0
726
Google search engine
Google search engine

 

 

मालेगाव – – एकीकडे काश्मिरी पंडितांची दुःस्थिती, काश्मीरमध्ये हिंदूंसाठी राबवले जाणारे ‘मिशन ऑल आऊट’, पश्‍चिम बंगालमधून बाहेर पडणारे असंख्य हिंदू, अशी हिंदूंची स्थिती आहे, तर दुसरीकडे ‘हम दो, हमारे दो’ हा कायदा केवळ हिंदूंसाठी लागू करण्यात आला आहे. हे असेच चालू राहिल्यास बहुसंख्य हिंदू अल्पसंख्य होण्यास वेळ लागणार नाही. हिंदूंनो, आताच संघटित व्हा अन्यथा मालेगावमधूनही पिटाळले जाल, अशी सतर्कतेची चेतावणी भाग्यनगर येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी येथील हिंदु धर्मजागृती सभेत हिंदूंना उद्देशून दिली.  ७ एप्रिल या  दिवशी कॉलेज सोयगांव रोड येथील डी.के. कॉर्नर मैदानात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर उपस्थित होत्या.

हिंंदूंचे शौर्य दडपण्याचे देशविघातक षड्यंत्र हाणून पाडा ! – सौ. क्षिप्रा जुवेकर, रणरागिणी

देहलीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर कायद्यात पालट झाले; मात्र अजूनही महिलांवरील अत्याचार न्यून झालेले नाहीत. काश्मिरी हिंदुंची दुर्दशा, हिंदुत्वनिष्ठांच्या दिवसाढवळ्या होणार्‍या हत्या, तसेच पोलीस आणि राजकारणी यांची निष्क्रीयता, अशा प्रकारे हिंदूंचे शौर्य दडपण्याचा प्रयत्न होत आहे. हे देशविघातक षड्यंत्र हाणून पाडा.

ईश्‍वराचा आशीर्वाद, धर्माचरण आणि धर्माभिमान यांतूनच वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार ! – सदगुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

ईश्‍वराच्या आशीर्वादामुळेच सनातनच्या साधकांना डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्यांच्या प्रकरणी जामीन संमत झाला. लवकरच ते निर्दोष सुटतील. या प्रकरणात सनातनला नाहक गोवण्यात आले. पुरोगाम्यांच्या सांगण्यावरून सनातन संस्थेच्या साधकांचा अतोनात छळ करण्यात आला. तरीही प्रत्येकाने धर्माचरण केले. त्यामुळे सनातनला ईश्‍वराचा आशीर्वाद आहे. ईश्‍वराचा आशीर्वाद, धर्माचरण आणि धर्माभिमान यांतूनच वर्ष २०२३ मध्ये ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होणार आहे.

पाकिस्तानचा ‘मोस्ट फेवर नेशन’ दर्जा काढून पाकिस्तानला शत्रूराष्ट्र घोषित करावे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी याच मालेगावमधून आरोप झाले. धर्मांधांच्या दबावाखाली येऊन पोलीस आणि प्रशासन हिंदूंवर अत्याचार करत आहेत. अत्याचारी रोहिंग्या मुसलमानांना देशात थारा न देता त्यांना पाकिस्तानात पिटाळून लावायला हवे. आपण एकीकडे पाकिस्तानला शत्रूराष्ट्र मानतो, तर दुसर्‍या बाजूला केंद्रशासनाने ‘मोस्ट फेवर नेशन’मध्ये पाकिस्तानचे नाव घेऊन त्याला मित्रपक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. पाकिस्तानचा ‘मोस्ट फेवर नॅशन’ हा दर्जा काढून घेऊन पाकिस्तानला शत्रूराष्ट्र घोषित करण्यात यावे.

क्षणचित्र : सभेला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सुभाष भामरे उपस्थित होते.