आज भाईंदर (जिल्हा ठाणे) येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु धर्मजागृती सभा
भाईंदर (जिल्हा ठाणे) – येथील पश्चिम भागातील पोलीस ठाण्याच्या परिसरात वर्ष १९४१ मध्ये स्थापन करण्यात आलेले पुरातन श्री गणेश मंदिर हे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पाडण्याचा डाव स्थानिक प्रशासनाने रचला आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी येथील गणेशभक्त आणि धर्मप्रेमी यांनी ‘श्री गणेश मंदिर बचाओ संघर्ष समिती’ स्थापन केली आहे. मोक्याच्या ठिकाणी आणि सहस्रो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या या पुरातन श्री गणेश मंदिरामुळे रहदारीला कोणताही अडथळा नाही, तरीसुद्धा हे मंदिर हटवण्यासाठी स्थानिक प्रशासन हिंदुद्रोही षड्यंत्र का रचत आहे, असा प्रश्न स्थानिक हिंदूंकडून केला जात आहे. हे मंदिर वाचवण्यासाठी या समितीच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहिमा, जनप्रबोधन आदी वैध मार्गांनी, तसेच कायदेशीर मार्गानेही लढा दिला जात आहे.
या अभियानामध्ये हिंदु धर्मप्रेमी, गणेशभक्त, तसेच विविध संघटना, मंडळे, मंदिरांचे पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. हिंदु जनजागृती समितीनेही ‘श्री गणेश मंदिर बचाओ संघर्ष समिती’ला पाठिंबा दर्शवला आहे.
याचाच एक भाग म्हणून रविवार, ८ एप्रिल या दिवशी ‘श्री गणेश मंदिर बचाओ संघर्ष समिती’ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या पुढाकाराने भाईंदर (प.) येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून समस्त भाविक आणि धर्मप्रेमी संघटित होणार आहेत.