रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी /
महाराष्ट्रात सध्या दोन चळवळी ने गाजत आहे. एक वनविभागाची वृक्ष लागवड आणि दुसरी पानी फौंडेशन ची वॉटर कप चळवळ. या दोन्हीं चळवळीचा आत्मा म्हणजे लोकसहभाग…या लोक सहभागातून आज 16 व्या दिवशी 8 कोटी 50 लक्ष 88 हजार 60 इतकी वृक्ष लागवड करण्यात आली.. आणि शासनाच्या सहकार्याने सत्यमेव जयते वॉटर कप चळवळीतून जलसंधारणाची कामे करून 2000 हजार गावे लोक सहभागातून दुष्काळ मुक्तीच्या वाटेवर आहेत. याच चळवळीचा एक भाग म्हणजे रोपवाटिका ज्या करिता 5 गुणांचा अंतर्भाव होता..त्या करिता नर्सरी तयार करण्याचे नियम होते..ती झाडे गावातील लोकांनी स्वतः जगवावी, वाढवावी, काळजी घ्यावी. स्थानिक परिसरातील, जंगलातील असावी.. शेतीपूरक जोड उत्पन्नाचे साधन असावी.. असे विविध मुद्दे लक्षात घेऊन ही जाणीव प्रशिक्षणातून करण्यात आली.. त्याचा परिणाम वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी जवळपास 2 लक्ष झाडांची निर्मिती अश्या पद्धतीने गाव पातळीवर केली…ही झाडे लोकांनी जाणीव पूर्वक वाढवली आणि जगवलीही तेही लोक सहभाग आणि श्रमदान या संकल्पनेतून., हे विशेष !!
धारणी चिखलदरा तालुक्याचा मिळून बनलेला मेळघाट सर्वत्र वन क्षेत्राने व्यापलेला..त्यामुळे मेळघाट च्या लोकांना जंगलाची काही नव्हाई नाही..येथील प्रत्येक माणूस लहानपणा पासून जंगल झाडे पाहतच मोठा झाला आहे. एखाद्या माणसाजवळ जे सर्वात जास्त आहे त्या गोष्टी विषयी फार काही विशेष वाटत नाही. अशी सर्व साधारण मानसिकता असते. तसेच मेळघाट च्या माणसाची वन खाते, टायगर प्रोजेक्ट विषयी काही कारणाने नाराजीची असलेली मानसिकता लक्षात घेता, मेळघाट च्या माणसाकडून लोक सहभागातून, श्रमदानातून रोपवाटिका निर्माण करून घेणे आणि तिची लागवड करून घेणे.. तसे कठीणच काम होते..पण या मेळघाट च्या माणसाची जंगलांशी सांस्कृतिक आंतरिक दुरावलेली नाळ पुन्हा जुळवण्याचे काम सत्यमेव जयते वॉटर कप च्या माध्यमातून होत आहे..असे वाटते.. चिखलदरा मध्ये वसतापूर, भिलखेडा, कुलंगणा बु, कुलंगणा खुर्द, तेलखर, बोराला, चीचखेडा, जामली आर , खटकाली, कोटमी, कातकुंभ, कान्हेरी, मडकी आणि धारणी तालुक्या मध्ये कोठा, मोगरदा, सालाई, कंजोली, रेहत्या, भूलोरी, कलामखार, खाऱ्याटेमभरू, अशा गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप प्रशिक्षण घेऊन आल्यावर रोपवाटिका निर्मिती सुरू केली..
नुकताच मानसुधावडी या गावात 2100 रोपांची रोपवाटिका तयार करून एकाच दिवशी 500 अधिक रोपे लोकांनी गाव परीसरात, शेतीच्या धुऱ्या वर लावली.. राजपुर गावात 15000 हजार रोपांची रोपवाटिका तयार करण्यात आली.. शेवगा, जांभूळ, सीताफळ, बास अशा शेतीपुरक उत्पादनक्षम झाडांना पसंती दिली गेली..ही झाडे लोकांनी स्वतःहून आपाआपल्या शेतात लावली.. जलसंधारणाचे उपचार सलग समतल चर, खोल सलग समतल चर यावर ही झाडे लावल्या गेली..या नर्सरी साठी स्वतःच्या शेतातील जागा, पाणी दिले.. चिखलदरा तालुक्यातील माखला गावाने तर 2500 झाडांची फक्त कटांग, माणगा या बास प्रजातीची रोपे तयार केली आहेत..गावातील लोकानी शेताच्या धुऱ्या वर लावायला सुरवात केली आहे..पाणी फौंडेशन च्या मूल्यांकन टीम ने विचारले की, ‘बास का ही नर्सरी क्यू लगाया?’ ” आप ने हमारे घर नही देखे क्या गाव मे आके?” असे झाडाचा उपयोग सुचवणारे उत्तर… मेहरिअम या गावात तर रोपवाटिकेत चारोळीची खूप सारी रोपे पाहून आनंद झाला.. 300-400 रु किलो भाव असतो चारोळी च्या बियांचा. या झाडांची बियांची उगवण क्षमता फारच कमी आहे.. त्यामुळे या झाडांची निर्मिती रोपवाटिकेत करणे कठीण काम आहे..पण या वॉटर कप स्पर्धेच्या रोपवाटिका संकल्पनेतून खूप मोठ्या प्रमाणात चारोळी चे झाड निर्माण करणारे झाडीपट्टीचे अनुभवाच्या शाळेत शिकलेले वनस्पती शास्त्रज्ञ या तुन भेटले..
असे सगळे अनुभव या कामातून मिळत आहेत..कोणत्याही शाश्वत विकासाच्या गोष्टी ह्या जाणीव पूर्वक प्रयत्नातून, अभ्यासातून आणि विधायक अंमलबजावणी तुनच शक्य आहे..त्यासाठी लोक सहभागाच्या चळवळी या पिढी दर पिढी वृद्धिंगत झाल्या पाहिजेत…तेव्हाच तेहत्तीस टक्क्यांची वाट ही हिरवीगार व्हायला वेळ लागणार नाही…