लक्ष्मणपुरी – जर भाजप सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही अॅट्रॉसिटी कायद्यात पालट न करण्यासाठी संसदेत विधेयक आणू शकते, तर अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी सरकार कायदा का करू शकत नाही?, असा प्रश्न अयोध्येतील रामजन्मभूमीवरील श्री रामललाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी उपस्थित केला आहे.
१. सत्येंद्र दास म्हणाले की, भाजप रामाच्या नावामुळे सत्तेवर आला आणि आता तो रामाला विसरला आहे. सरकार जाणीवपूर्वक हे प्रकरण टाळण्याच्या प्रयत्नात आहे; मात्र रामभक्त हे स्वीकारणार नाहीत. याचा परिणाम पुढील निवडणुकीत भोगावा लागणार आहे. त्यामुळे भाजपने आताच सतर्क व्हावे.
२. श्री रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास म्हणाले, ‘‘केंद्रातील भाजप सरकार बहुमतात आहे. सरकार स्वतःहून राममंदिर बनवील. जनतेने केंद्रात आणि राज्यात राममंदिरासाठीच भाजपला निवडून दिले आहे. त्यामुळे राममंदिराचे दायित्व सरकारचेच आहे.’’
३. ‘धर्मसेना’ संघटनेचे अध्यक्ष आणि कारसेवक संतोष दुबे म्हणाले की, सरकारने राममंदिरासाठी विधेयक आणले पाहिजे. जर असे झाले नाही, तर सरकार वाचणार नाही. जर राममंदिर बांधले, तर हे सरकार परत सत्तेत येईल.