मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली असून मराठा आंदोलकांकडून मुंबईतही बंद पाळण्यात येत आहे. मुंबईतील ‘मराठा क्रांती महामोर्चा’ या बंदचे नेतृत्व करत आहे. सुरुवातीला मुंबईला बंद मधून वगळण्यात आल्याचं सांगण्यात आल्याने बुधवारी रात्री उशिरापर्यंत गोंधळाचं वातावरण होतं.नाशिक, ठाणे आणि नवी मुंबई या तीन शहरांत बंद पाळला जाणार नसून सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे-नवी मुंबईतील शाळा मात्र बंद ठेवल्या आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटही बंद ठेवण्यात आलं आहे.दूध, शाळा-महाविद्यालये आणि वैद्यकीय सेवांना या बंद मधून वगळण्यात आले असून बंद सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत असेल, असे जाहीर करण्यात आले होते. २५ जुलै रोजी झालेल्या मराठा क्रांती मोर्चा दरम्यान नवी मुंबई आणि ठाणे शहरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. त्यामुळे या दोन्ही शहरांत आज बंद पाळण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले.