चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)
पूर्वी शिकवणी म्हणजे आजचे कोचिंग क्लास फक्त ‘ढ’ मुले लावत होते. कच्चे, अभ्यासात ढ, ज्यांना एकदा शिकवलेले समजत नाही, अशा मुलांची अभ्यासाची उजळणी घेण्यासाठी अगदी परीक्षेत पास होण्यासाठी शिकवणी लावायची पद्धत होती. परंतु ही पध्दत आता बदलली आहे. विद्यार्थी कितीही चांगल्या शाळेत, महाविद्यालयात असला तरी व कितीही हुशार असला तरी शिकवणी वर्ग हमखास लावण्याचा ट्रेंड आला आहे. मात्र निकालापुर्वीच व उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येच दहाविच्या शिकवणीवर्गांना सुरूवात झाली असुन बारावीचे वर्ग सुध्दा सुरू होण्याच्या मार्गावर आहे.
चांदूर रेल्वे शहरातील नववीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा नुकतीच ८-१० दिवसांपुर्वीच संपली. व उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना सुरूवात झाली. मात्र या हक्काच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची मजा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना घ्यायला मिळत नसुन अभ्यासातुन आता पुन्हा परिक्षेनंतर अभ्यासाकडे वळले आहे. चांदूर रेल्वे शहरात दहाव्या वर्गांचे शिकवणी वर्ग गेल्या ५-६ दिवसांपासुन सुरू सुध्दा झाले असुन यासाठी भरमसाठ शुल्क आकारण्यात येत आहे. तर ज्यांनी यंदा दहावीची परिक्षा दिली म्हणजेच आयुष्याच्या वळणावरील शिक्षणाच्या पहिल्या टप्प्याची परीक्षा जेमतेम आटोपत नाही तोच दुसऱ्या टप्प्याच्या तयारीचे टेन्शन त्यांच्यामागे लागले असुन शिकवणी वर्गांचे पॉम्पलेट आता घरोघरी जाणे सुरू झाले आहे. दहावी व बारावीच्या या परीक्षा अतिशय कठीण असल्याचे चित्र निर्माण करून विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शिकवणी वर्गाला लावण्यात जोर दिला जात आहे. नववीच्या विद्यार्थ्यांचे निकालापर्यंत ही वाट न बघून विद्यार्थ्यांना नववीच्या परिक्षेनंतर लगेच दहाविच्या शिकवणीवर्गाला सुरूवात केली आहे. तसेच शिकवणीवर्गांमध्ये विद्यार्थी मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे.
कोचिंग क्लासची सरकार दरबारी नोंद का नाही ?
साधा किराणा दुकानदार शॉप अॅक्ट लायसन्स काढतो. पुढे त्याच्या दुकानात वजनकाटा तपासणारे, अन्न-औषधीवाले, बालकामगार तपासणारे अधिकारी तपासण्या करतात. प्रत्येक व्यवसायासाठी तपासणी करणाऱ्या स्वतंत्र यंत्रणा आहेत. मग अशा कोचिंग क्लासची सरकार दरबारी नोंद का नाही ? त्यांच्या जाहिरातीतील दाव्याची सत्यता तपासून पाहणारी यंत्रणाही नाही. त्यांच्यासाठी सुध्दा अशीच स्वतंत्र यंत्रणा असणे गरजेचे असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले.