रामनाथी (गोवा) – अयोध्येतील श्रीराममंदिराच्या याचिकेवरील सुनावणीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वेळकाढू भूमिका घेतली आहे. अशा वेळी भाजप शासनाने मागील कार्यकाळातच श्रीराममंदिर उभारणीसंबंधी अध्यादेश आणावा, अशी हिंदूंची अपेक्षा होती.यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने श्रीराममंदिर उभारणीचे आश्वासन दिले असल्याने आता जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा आदर राखून सरकार स्थापन होताच त्यांनी श्रीराममंदिराचे आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे अपेक्षित आहे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.)चारुदत्त पिंगळे यांनी केली. भाजप सरकारने अलाहाबादचे नामकरण ‘प्रयागराज’ असे करून,तसेच कुंभमेळ्याचे सुयोग्य नियोजन करून एक चांगली कृती केली आहे; मात्र श्रीराममंदिराची उभारणी न झाल्यास हिंदूंच्या मनात ‘आश्वासन देऊन विश्वासघात केल्या’ची भावना प्रबळ होऊ शकते, असेही ते म्हणाले. 29 मे या दिवशी श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहात ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी प.पू. भागीरथी महाराज, स्वामी श्रीरामज्ञानीदासजी महाराज, बंगाल येथील श्री सत्यानंद महापिठाचे स्वामी आत्मस्वरूपानंदजी महाराज, सद्गुरु नंदकुमार जाधव, तसेच सदगुरु(डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पू. नीलेश सिंगबाळ यांनी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट केला. 29 मे ते 4 जून या कालावधीत चालणार्या या 7-दिवसीय अधिवेशनाच्या प्रथम दिनी भारत आणि बांगलादेश येथून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे 240 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. ‘हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात ‘सीबीआय’कडून झालेल्या अन्याय्य अटके’चा अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात निषेध करण्यात आला.