कळंब तालुक्यात कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
उस्मानाबाद : सततची नापिकी, कर्ज यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने गावालगत नदीच्या कडेला एका आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कळंब तालुक्यातील खंडेश्वरी मस्सा येथे रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
कळंब तालूक्यातील खंडेश्वरी मस्सा येथील शेतकरी नागनाथ भगवान किलचे (वय ६०) यांना तीन एकर शेती असून, यावरच कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. दरम्यान, निसर्ग साथ देत नसल्याने यावर उदरनिर्वाह भागवून कर्ज कसे फेडायचे या चिंतेने ते ग्रस्त होते. यातून त्यांनी रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास गावालगतच्या नदीजवळील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.