चांदूर रेल्वे –
दीड वर्षापासुन पंतप्रधान आवास योजनेचे फॉर्म देऊन सर्व प्रक्रिया पार पडली. पात्र लाभार्थ्यांच्या नावाचा प्रस्तावही वरिष्ठांना पाठविण्यात आला. व या योजनेचा निधी सुध्दा चांदूर रेल्वे नगर परिषदला प्राप्त झाला. मात्र नगर परिषद प्रशासनाकडून अनेक दिवसांपासुन या कामात दिरंगाई होत असल्यामुळे आज शुक्रवारी दुपारी आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी आक्रमक लाभार्थ्यांचा मोर्चा नगर परिषदवर काढण्यात आला.
‘सर्वांसाठी २०२२ पर्यंत घरे’ या पंतप्रधान यांच्या महत्त्वाकांशी योजनेची घोषणा होऊन वर्षे उलटले तरी चांदूर रेल्वे शहरात या योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घराची एक वीटही रचण्यात आली नाही. झोपडपट्टीवासीयांची व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि अल्प उत्पन्न गट लाभार्थीयांचे सर्वेक्षण पूर्ण करून त्यांचा तपशील व दस्तऐवज तपासून व खात्री करून ४७५ अर्जांपैकी २१५ पात्र लाभार्थीयांची विभागणी केली व ऑक्टोंबर २०१८ मध्ये अंतिम यादी तयार करून प्रस्ताव चांदूर रेल्वे नगर परिषदमार्फत शासनाला केपीएमजी संस्थेमार्फत पाठविण्यात आला. यानंतर जानेवारी महिन्यात या योजनेचा ८६ लाखांचा निधी नगर परिषदला प्राप्त झाला. परंतु याचे वाटप अद्यापही न झाल्यामुळे अनेक बेघर असलेल्या नागरिकांना आपल्या हक्काच्या घरास मुकावे लागत आहे. देशातील प्रत्येक कुटुंबाला जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था, २४ तास वीज व पोहोचरस्ता या सुविधांसह पक्के घर असायला हवे, असे विचारात घेऊन पंतप्रधानांच्या सन २०२२ पर्यंत सर्वासाठी घरे या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. केंद्र शासनाने सदर योजना राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांच्या क्षेत्राकरिता लागू केली. परंतु चांदूर रेल्वे नगर परिषद अंतर्गत एकाही घराच्या बांधकामाला निधीअभावी सुरूवात झाली नाही. सदर निधी सात दिवसाच्या आत लाभार्थ्यांना द्यावा अन्यथा सात दिवसानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आम आदमी पार्टी तर्फे लाभार्थ्यांना घेऊन “सत्याग्रह” आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टीने दिला होता. तरीही निधी न मिळाल्यामुळे शुक्रवारी नगर परिषदवर मोर्चा काढण्यात आला. यानंतर कार्यालयीन अधिक्षक धनराज गजभिये यांना कार्यालयात घेराव घालुन ठिय्या देण्यात आला. यावेळी नितीन गवळी, माजी न. प. सभापती मेहमुद हुसेन, अण्णा अंडेतिया, गौतम जवंजाळ, विनोद लहाने, पंकज गुडधे, गोपाल मुरायते, बालु पठान, निलेश कापसे, रहेमत पठान, गजानन चौधरी, दत्ता नेमाडे, शेखर मगराट, अफरोज खान, साधना भेंडे, उज्वला घोडे, पुष्पा गोखे, भारती क्षिरसागर, वंदना पेटे, कमला पहाडे यांसह शेकडो लाभार्थी, शहरवासी उपस्थित होते. दिला आहे.
मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला “कुलुप”
आम आदमी पार्टीतर्फे ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती मिळताच मुख्याधिकारी गैरहजर होत्या. त्या मिटींगला गेल्याचे समजते. मात्र त्यांच्या गैरहजेरीत उघडे असणारे त्यांचे कार्यालय कुलुप लाऊन बंद होते. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी आम आदमी पार्टीच्या आंदोलनाचा धसका घेऊन त्यांचे कार्यालय बंद ठेवायला लावल्याची चर्चा होती.