चांदूर रेल्वे : – (ता. प्र.)
चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड येथील बि.ई. सिव्हील प्रथम वर्षाला शिकणाऱ्या अनुराग अनिल जगनाडे (वय१९) यांने सिरीज मधुन विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ ऑगस्ट ला दुपारी २ वाजता दरम्यान घडली होती. दोन वर्षापूर्वी अनुराग चे एका मुलीशी प्रेमसंबध आले. एक व्यक्ती, एक मुलगी व एका मुलाने मॅसेज, फोन करून सतत धमकावुन त्यांचा प्रचंड मानसिक छळ केला. त्या छळाला कंटाळून अनुराग ने आत्महत्या केल्याचे समजते. या प्रकरणी मृतकाच्या वडिलांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी ७ ऑगस्टला तिघांवर गुन्हा दाखल केला असुन डॉ. जयंत कारमोरे यांना शनिवारी (ता. ८) दुपारी अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, पळसखेड रहिवाशी अनिल नारायण जगनाडे मुलांच्या शिक्षणासाठी अमरावती येथे राहतात. त्यांचा मुलगा अनुराग अनिल जगनाडे (वय १९) हा राम मेघे इंजिनिअरींग कॉलेजला सिव्हिल इंनिनिअरींग प्रथम वर्षाला शिकत होता. सन २०१८ मध्ये अनुराग १२ वी मध्ये अमरावती येथे शिकत असतांना शिकवणी वर्गामध्ये एका मुलीशी ओळख होऊन प्रेमसंबध झाले होते. ही बाब अनुरागच्या घरच्यांना समजली. अशातच ती मुलगी व डॉ. जयंत कारमोरे अनुरागच्या अमरावतीच्या घरी दोन तीन वेळा दारू पिवुन आले व त्यांनी अनुरागसह त्यांच्या कुटूंबियांना दमदाटी केली. तसेच अनुराग ला “तु बाहेर भेट तुझे हातपाय तोडुन टाकतो” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे लेखी तक्रारीत नमुद आहे. परंतु मुलाच्या भविष्याचा विचार करून श्री. जगनाडे चुप बसले. जयंत कारमोरे यांचे दबावात येऊन अनुराग २-२ दिवस घरी येत नव्हता. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जयंत कारमोरे, त्या मुलीसह पोलिसांना घेऊन अनुराग च्या घरी आले. तेव्हा पोलिसांनी दोघांकडून एकमेकांना पुन्हा भेटणार नाही असे लिहून घेतले. त्यानंतर ती मुलगी अनुराग च्या मोबाईलवर नेहमी फोन व मॅसेज करून, भेटून तु माझ्याशी संपर्क ठेवला नाही तर माझ्या जीवाचं बरेवाईट करून तुला फसविन अशा धमक्या देत असल्याचे अनुरागने वडिलांना सांगीतले होते. मात्र नोकरीतुन वेळ मिळत नसल्याने ते अनुरागला समजावुन सांगत होते. अशातच कोरोना लॉकडाऊनच्या काळात कॉलेजला सुट्ट्या असल्याने तो १५ दिवसापूर्वी पळसखेड आला होता. या काळात अनुरागने मुलीचे आई – वडिल तिला टॉर्चर करीत असल्याने ती जीव देते असे सांगत असल्याचे वडिलांना सांगीतले. वडिलांनी तीला फोन करून असे करू नको सांगीतले होते. यानंतर अचानक २ ऑगस्ट ला दुपारी अनुराग ची तब्येत अचानक बिघडल्याचे व त्याला अमरावती येथे आणत असल्याचा वडिलांना फोन आला. तेव्हा वडील ड्युटीवरून थेट इर्विन हॉस्पीटलमध्ये पोहचलो. यावेळी डॉक्टरांनी त्याने रक्तवाहिणीमधुन विषारी औषध घेतल्याने त्याचा मृत्यु झाल्याचे सांगीतले. मुलाचे शवविच्छेदन करून पळसखेड येथे आले व वडील घरात गेला असता टि.व्ही. जवळ कुलरवर अनुराग ने इंग्रजीमध्ये डेप्युटी कमिश्नर, राजापेठ पो.स्टे. अमरावती यांच्या नावाने सुसाईड नोट लिहलेली मिळाली. त्यात ती मुलगी व साहिल राज ठाकरे हे मॅसेज व कॉल करून दबाव टाकून त्याचा सतत मानसिक छळ केल्याचे लिहिलेले असल्याचे समजते. त्यामुळे माझ्या मुलाला डॉ. जयंत कारमोरे, ती मुलगी व साहिल राज ठाकरे यांनी संगणमत करून आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची लेखी तक्रार मृतकाचे वडिल अनिल जगनाडे यांना चांदूर रेल्वे पो. स्टे. ला दिली. लेखी तक्रार व पीएम रिपोर्ट वरून चांदूर रेल्वे पोलिसांनी स्थानिक अशोक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे, ती मुलगी व साहिल ठाकरे विरूध्द भादंवि कलम ३०६, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असुन डॉ. जयंत कारमोरे यांना शनिवारी दुपारी वर्धा येथून अटक केली आहे. अटकेची कारवाई ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात पीएसआय राहूल चौधरी, गणेश मुपडे, हे.कॉ. श्रीकृष्ण शिरसाट, पो.कॉ. शेख गणी यांनी केली.
जयंत कारमोरेंना दुपारी अटक केल्यानंतर सायंकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना चांदूर रेल्वेतील ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आले. येथुन त्यांना अमरावती इर्विन रूग्णालयात नेण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.