स्व. संजय बंड यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी
सायन्सकोर मैदानाच्या प्रवेशव्दारांना त्यांचे नाव
-पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 26 : माजी आमदार स्व. संजय बंड हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे जनमानसाचे सच्चे प्रतिनिधी होते. त्यांची स्मृती व कार्यकतृत्वाचा गौरव सदैव जनमानसांच्या स्मरणात रहावा म्हणून शहरातील सायन्सकोर मैदानाच्या दोन्ही प्रवेशव्दारांना स्व. संजय बंड यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केली.
शहरातील रुक्मिणी नगर चौकाला लोकनेता स्व. संजय बंड चौक व हमालपुरा ते काँग्रेसनगर रस्त्याचे लोकनेता स्व. संजय बंड मार्ग नामकरण करण्यात आले असून, त्याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाला. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे पाटील, शहराचे महापौर चेतन गावंडे, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, प्रीतीताई संजय बंड, नगरसेवक नूतनताई भुजाडे, माजी महापौर तथा नगरसेवक विलास इंगोले, मनपा विरोधी पक्षनेते बबलूभाऊ शेखावत, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे उपसभापती नानाभाऊ नागमोते, शिवसेना जिल्हाध्यक्ष दिनेश बूब, माजी खासदार अनंतराव गुढे, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, आयोजक तथा रुक्मिनी गणेत्सोव मंडळाचे अध्यक्ष प्रदीपभाऊ हिवसे, भुषण फरकाळे यांच्यासह अनेक मान्यवर व शिवसैनिक आदी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, शिवसेनेचे माजी आमदार स्व. संजय बंड यांनी जनसामान्यांचे काम करण्यासाठी सदैव धडपड केली. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी राजकारणात पर्दापण केले तरी, त्यांनी समाजकारण करूनच जनमाणसात त्यांचे नाव अजरामर केले आहे. त्यांनी रुक्मिनी गणेत्सोव मंडळ स्थापन करुन विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. संजूभाऊ यांनी सच्चा शिवसैनिक म्हणून लोकहिताचे अनेक कामे केलीत. संजूभाऊ हे एक अविस्मरणीय व्यक्तीमत्व होते. हिंदुत्व म्हणजे सर्व जाती, धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा विचार त्यांनी आपल्या कार्यशैलीतून दाखवून दिला होता. स्व. बंड यांनी लोकांप्रती केलेल्या कार्य व त्यांचा कतृत्वाचा गौरव म्हणून चौकाचे व रस्त्याचे नामकरण करण्यात आले आहे. सायंन्सकोर मैदानाच्या दोन्ही प्रवेशव्दारांना स्व. संजय बंड यांचे नाव देण्यात येईल, असेही श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
लोकार्पण कार्यक्रमात शिवशाही महोत्सव 2020 अंतर्गत ऑनलाईन पध्दतीने आयोजित ‘किल्ले बनवा’ या स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण जिल्ह्यातील सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.