अमरावती, दि. 20 : कोरोना प्रतिबंधासाठी संचारबंदीत निर्बंध अधिक कडक करण्यात आले असून, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते सकाळी 11 अशी करण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला.
आदेशानुसार, सर्व प्रकारच्या जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांतर्गत किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध विक्री केंद्रे, डेअरी, बेकरी, मिठाई, सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने (चिकन, मटण, पोल्ट्री, मासे व अंड्यांच्या दुकानांसह), कृषी अवजारे व कृषी उत्पादने (बी-बियाणे, रासायनिक खते, कृषी अवजारे) पाळीव प्राणी, खाद्यपदार्थाची दुकाने, पावसाळ्यासाठी करावयाच्या कामाकरिता आवश्यक असलेली सर्व प्रकारची दुकाने ही सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत खुली राहतील.
*उपाहारगृहांना घरपोच सेवेची मुभा*
सर्व प्रकारची हॉटेल्स, बार, उपाहारगृहे, खाणावळी यांना घरपोच सेवा देण्यासाठी सायंकाळी 7 वाजेपर्यंत परवानगी असेल.
*यांना वगळले*
सर्व प्रकारची रुग्णालये, उपचार केंद्रे, लसीकरण केंद्रे, दवाखाने, वैद्यकीय व विमा कार्यालये, औषधी दुकाने, औषधी निर्मिती कंपन्या, वैद्यकीय उत्पादनासंबंधित व वितरणासंबंधित विक्रेते यांची वाहतूक व त्यासंबंधीची पुरवठा साखळी, औषधालये, नर्सिंग होम, वैद्यकीय प्रयोगशाळा, रुग्णवाहिका, तसेच इतर वैद्यकीय आरोग्य सुविधा सेवा, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे व त्याबाबत कच्चा माल पुरविणारे उत्पादक व वितरक, पेट्रोलपंप व पेट्रोलियम पदार्थ संबंधित उत्पादने, एटीएम केंद्रे यामधून वगळण्यात येत आहेत. जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा, कृषी सेवा संबंधित मालवाहतुकीसाठी सदरचे निर्बंध लागू असणार नाहीत. ही वाहतूक पूर्णपणे सुरु राहील.
000
—