अमरावती ब्रेकिंग :- नवीन संचारबंदी आदेश कडक निर्बंधात 22 मे पर्यंत वाढ – पहा पूर्ण माहिती

0
6297
Google search engine
Google search engine

*संचारबंदीतील कडक निर्बंध 22 मेपर्यंत लागू*

*जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी*

 

अमरावती, दि. 14 : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदीतील कडक निर्बंध 22 मेच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.

संचारबंदीत कडक निर्बंध जारी करणारा आदेश 15 मेच्या मध्यरात्रीपर्यंत यापूर्वी लागू करण्यात आला आहे. आता थोड्या बदलांसह प्रतिबंधात्मक आदेश 16 मेपासून 22 मेच्या रात्री 12 वाजेपर्यंत पारित करण्यात आला आहे.

आदेशानुसार, सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पीठाची गिरणी आदी दुकाने, तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह), सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने व बार घरपोच सेवा सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करण्याचे आदेश आहेत. रेशन दुकानेही सकाळी सात ते दुपारी 3 सुरु राहतील. त्यासाठी तहसीलदार व स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांचे व्हाटसअप ग्रुप तयार करून टोकन सिस्टीमचा अवलंब करण्याचे निर्देश आहेत.

हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेलमध्ये स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. तिथे ग्राहक आढळून आल्यास आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक पोलीस ठाणे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील. दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण सकाळी 7 ते सकाळी 12 दरम्यान करता येईल.

 

सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद राहतील. याबाबतची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांची राहील. पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी, तसेच संस्थांसाठी संबंधित असणा-या साहित्याच्या उत्पादनाच्या निगडित दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, सदर दुकानांची केवळ घरपोच सेवा सकाळी 7 ते दुपारी 3 या कालावधीत सुरु राहील. पशुसंवर्धन अधिका-यांनी त्याचे संनियंत्रण करण्याचे आदेश आहेत.

कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित सर्व दुकानांनी सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत घरपोच सेवा द्यावी. तालुका कृषी अधिकारी यांनी दुकानदार, शेतकरी बांधव यांचे व्हाटसअप ग्रुप तयार करून टोकन सिस्टीम अवलंबवावी. त्याचप्रमाणे, आवश्यक निविष्ठा बांधावरही पोहोचविण्याचे निर्देश आहेत.

 

*हे राहणार संपूर्ण बंद*

सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगिचे, केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्युटीपार्लर हे संपूर्ण बंद राहणार आहेत. सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कला केंद्र, प्रेक्षागृहे, सभागृहे बंद राहतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवण्या बंद राहतील. ऑनलाईन शिक्षण-प्रशिक्षण व परीक्षा घेण्यास प्रतिबंध नाही. मात्र त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिका-यांवर आहे.

*हे राहणार सुरू*

सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहतील. मेडिकल स्टोअर्स, दवाखाने, ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरु ठेवता येईल. चष्म्याची दुकाने बंद राहणार असली तरी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना डॉक्टरांनी त्यांच्या दवाखान्याशी जोडलेल्या चष्मा दुकानातून चष्मा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राहील.

*लग्नाला केवळ पंधराजण*

सर्व स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल पूर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरूपात करण्याचे आदेश आहेत. लग्नामध्ये मिरवणूक, जेवणावळी, वाजंत्री पथक यांना परवानगी नाही. लग्नाला केवळ 15 व्यक्ती उपस्थित राहू शकतील व लग्नसोहळा 2 तासांत आटोपणे आवश्यक आहे. बेकायदेशीरपणे लग्नसोहळा पार पडल्यास कारवाई होईल. ग्रामस्तरीय दक्षता समित्यांनी त्याबाबत देखरेख करावी. लग्नसमारंभाचे नियोजन व नियंत्रणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस ठाण्याची असेल.

परवानगी दिलेल्या बाबींसाठीच वाहनांना इंधन

परवानगी दिलेल्या बाबींसाठीच वाहनांना इंधन मिळेल. तसे आदेश पेट्रोलपंपधारकांना देण्यात आले आहेत. कृषी संबंधित वाहने, ट्रॅक्टर, जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने, दुध डेअरी वाहने, प्रसारमाध्यमांची वाहने, शासकीय कंत्राटदार यांची वाहने, रुग्णांचे नातेवाईक यांना पेट्रोल वितरीत करावे. मालवाहतूक, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने यांच्याकरिता पेट्रोल, डिझेल यांची उपलब्धता करून देण्याबाबतची जबाबदारी कंपनीचे अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची राहील. उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी रोज अहवाल सादर करण्याचे आदेश आहेत. मालवाहतूक करताना वाहनचालक धरून दोनपेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत. परराज्यातून कोणतेही वाहन आल्यास त्यातील व्यक्तीकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. राज्य सीमावर्ती परिसरात मोर्शी, अचलपूर, धारणी एसडीओंनी तसे तपासणी नियोजन करण्याचे आदेश आहेत.

गॅस एजन्सीज मार्फत गॅस सिलेंडरचे वितरण व्हावे मात्र, ग्राहकांनी गॅस एजन्सीत प्रत्यक्ष जाऊन गॅस नोंदणी किंवा सिलेंडर घेऊ नये. याबाबत पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील.

सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व आस्थापना सदर कालावधीत बंद राहतील. या सर्व कार्यालयांना ऑनलाईन कामकाज करता येईल. केवळ अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेशी संबंधित शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू राहतील. मान्सूनपूर्व विकासकामे सुरु राहतील. सर्व शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी बंद आहेत.

अतिआवश्यक कामांसाठी संवाद कक्षाशी 1800 233 6396 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*गावात अनुदानवाटपापूर्वी कर्मचा-यांची तपासणी करा*

सर्व बँका, पतसंस्था, पोस्ट ऑफिस ही कार्यालये नागरिकांसाठी अत्यावश्यक कामांसाठी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत सुरू राहतील. संबंधित बँक व्यवस्थापकांनी, तसेच तहसीलदारांनी बँक करस्पाँडन्स नेमून त्यांची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतरच गावात अनुदान वाटप करावे. कृषी कर्जवाटपासाठी कँपचे नियोजन करताना बँक व्यवस्थापकांनी तहसीलदारांसमवेत व्हाटसग्रुप तयार करून कार्यवाही करावी.

आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्रे नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येत आहेत. तथापि, नागरिकांना ऑनलाईन स्वरूपात वेगवेगळ्या प्रमाणपत्र व सुविधांसाठी अर्ज करता येतील. दस्त नोंदणीचे काम पूर्णपणे बंद राहील.एमआयडीसी, उद्योग, कारखाने, सूतगिरणी येथे केवळ मूलस्थानी पद्धतीने (In-situ) कामकाज सुरु राहील. याबाबतची जबाबदारी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिका-यांची व जिल्हा उद्योग व्यवस्थापकांची असेल.

ई- कॉमर्समार्फत अत्यावश्यक घरपोच सेवा सुरू राहतील. स्थानिक दुकानदार, हॉटेलामार्फत घरपोच सेवा पुरविणारे कामगार यांच्याकडे ग्राहकाच्या घरी जाताना बिल व संबंधित दुकानदारांमार्फत देण्यात येणारे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील. स्थानिक स्वराज्य संस्था याबाबत संनियंत्रण करतील. कर्मचा-यांचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.सर्व सार्वजनिक, खासगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहने यांची वाहतूक नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी अनुज्ञेय राहील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहील. रूग्णांसाठी रिक्षा व खासगी वाहनास परवानगी राहील. तसे नियंत्रण वाहतूक पोलीसांनी ठेवण्याचे आदेश आहेत.

मालवाहतूक व रुग्णवाहतूक करणा-या वाहनांना व शासकीय वाहनांना परवानगीची गरज नाही. मात्र, मालवाहतूक साठा, खत साठा आदींबाबत फक्त लोडिंग व अनलोडिंग करण्यास परवानगी आहे. इतर कारणांसाठी व आवश्यक वैद्यकीय कारणांसाठी जिल्ह्याबाहेर वाहतूक करावयाची असल्यास https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवरून ई-पास काढून वाहतूक करता येईल.

या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रात आयुक्त, नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी, तसेच ग्रामीण भागात गटविकास अधिका-यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रणासाठी इंसिडेंट कमांडर म्हणून तहसीलदार व पोलीस विभागाकडे जबाबदारी आहे.

0000