अमरावती , दि. १६ :वरुड तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात नाव उलटून (14 सप्टेंबरला ) अकराजण बुडाले होते .त्यातील तीन मृतदेह घटनेच्या दिवशी सापडले असून उर्वरित आठ मृतदेह आज सापडले आहेत . त्यामुळे आता बुडालेल्या अकराही जणांचे मृतदेह हाती लागले आहेत . यासाठी घटनेच्या दिवसापासून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दलाची पथके तसेच जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी अविरत मदतकार्य करीत होते.
नारायण भोमाजी मटरे (वय 59 वर्ष ) , किरण विजय खंडाळे (वय 28 वर्षे ) , वंशिका प्रदीप शिवणकर ( वय 2 वर्षे ) , मोनाली उर्फ मोहनी सुखदेव खंडाळे (वय 11 वर्षे ) अदिती सुखदेव खंडाळे ( वय 13 वर्षे), निशा नारायण मटरे (वय 22 वर्षे ) , पियुष तुळशीदास मटरे (वय 8 वर्षे ) , अतुल गणेश वाघमारे (वय 25 वर्षे ) ,वृषाली अतुल वाघमारे (वय 19 वर्षे ) , अश्विनी अमर खंडाळे (वय 25 वर्षे ) , पूनम प्रदीप शिवणकर (वय 24 वर्षे ) या सर्वांचे मृतदेह सापडले आहेत. घटनेच्या दिवशी शाम मनोहर मटरे वय (वय 25 वर्षे ) व राजकुमार रामदास उईके (वय 45 वर्षे ) हे दोघे नदीतून पोहत बाहेर आल्याची माहिती मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी दिली आहे.
या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळावी यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून निवेदन दिले आहे. दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना शासनाकडून निश्चितच मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे .