चांदूर बाजार :
चांदूर बाजार शहरातील बेलोरा चौक परिसरातून जाणाऱ्या कठोरा ते चांदूर बाजार या राज्य महामार्गाचे बंद असलेले काम त्वरित सुरू करून पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिक, व्यापारी व भाजपचे माजी नगरसेवक श्री गोपाल तिरमारे यांनी जिल्हाधिकारी यांचा सहित कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती, तसेच तहसीलदार चांदूर बाजार यांच्या कडे निवेदनाद्वरे केली.
कठोरा ते चांदूर बाजार या राज्य महामार्गाचे बेलोरा फाटा ते इंदिरानगर पर्यंत सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या एक वर्षापासून सुरू असताना मागील एक महिन्यापासून रस्त्याचे काम पूर्णतः बंद असल्याने स्थानिक व्यापारी, नागरिक व विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू होते मात्र आता काम पूर्णतः बंद असून रस्त्यावर कंत्राटदार नियमित पाणी टाकत नसल्याने सतत सुरू असलेल्या वाहतुकीमुळे सर्वत्र धुळीच्या कणांमुळे नागरिक हैराण होवून आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. तसेच या वर्दळीच्या रस्त्यावरून शाळा, कॉलेज व शिकवणी वर्गाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे वाहने घसरून अपघाताचे प्रमाण वाढले असून विद्यार्थ्यांच्या जीवितास सुद्धा धोका निर्माण झालेला आहे.
करीता संथ गतीने व सद्या बंद असलेल्या रस्त्याचे काम त्वरित सुरू करून पूर्ण करण्याकरिता स्थानिक व्यापारी, नागरिक व भाजपचे तालुका सरचिटणीस तथा माजी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती व तहसीलदार चांदूर बाजार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.