विभागीय आयुक्त, खासदारांची घटनास्थळी भेट!
विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूर वरुन पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपुर वरून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री अंदाजे १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस झाली. त्यात प्राथमिक अंदाजानुसार 25 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही बस काही काळ कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.
भाजपाचे नेते आणि माजी मंत्री गिरीष महाजन यांनी जखमींची विचारपूस केली, तसेच अपघात स्थळाची पाहणी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अपघातस्थळी रवाना झाले आहेत.
तसेच विभागीय आयुक्त निधी पांडे, पोलीस उपमहानिरीक्षक अमरावती जयंत नाईकनवरे, खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी डॉ.एच.जी. तूम्मोड, पोलीस अधीक्षक सुनील कडासणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ऍड नाझेर काझी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.