चांदुरबाजार तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

0
1378
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 11 (जिमाका):* मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी विज्यांच्या कडकडाटामुळे चांदुरबाजार तालुक्यातील विविध ठिकाणच्या घरांचे व पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज सकाळी जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केली. नुकसान झालेल्या घरांचे व पिकांचे पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधिताना दिले.

चांदुर बाजार तालुक्यातील शिरसगाव बंड, इमामपूर व जमापूर येथील भटक्या विमुक्त वसाहतीमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे घरांचे पत्रे, विजेचे पोल व घरावर झाडें पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. याठिकाणी श्री. कटियार यांनी भेट देऊन येथील नागरिकांचे समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे सांत्वन करून शासकीय मदत तातडीने देण्याकरीता महावितरण, बांधकाम विभाग, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या. त्यानंतर गारपीट झालेल्या थुगांव पिंपरी येथे संत्रा बाग आणि इतर पिकांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कृषी अधिकारी यांना दिले.

पाहणी दरम्यान विभागीय कृषी अधिकारी प्रफुल सातव, चांदुरबाजारचे गटविकास अधिकारी श्री. शृंगारे, तहसीलदार गीतांजली गरड-मुळीक, कृषी अधिकारी, श्रीमती. एस.एम. नानीर, महावितरण अधिकारी श्री. सूर्यवंशी, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच गावातील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते.

*ईदनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा*

चांदुरबाजार तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरीता आज जिल्हाधिकारी दौऱ्यावर आले होते. यावेळी बाधित कुटुंबियांपैकी एका कुटुंबियांस त्यांच्या घरी जाऊन ईद सणानिमित्त सदिच्छा भेट देऊन त्यांना भेटवस्तू व शुभेच्छा दिल्या.